टीम लय भारी
चंपारण्य : अयोध्येतील राम मंदिराचा पुनरुच्चार करत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर हल्लाबोल केला. ज्यांनी रामाच्या अस्तित्वावरच प्रश्न उपस्थित केला. जे आत्मनिर्भर बिहार व आत्मनिर्भर भारताच्या वाटेत अडथळा बनत आहेत, त्यांना लोकशाही मार्गाने धडा शिकवायचा आहे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले. (Teach a lesson to those who question the existence of Rama, Prime Minister Narendra Modi’s attack on the opposition)
बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उतरलेल्या मोदी यांनी रविवारी चार सभा घेतल्या. चारही सभांमध्ये मोदी यांनी राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव व काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. चंपारण्यमध्ये मोदींची अखेरची सभा झाली. यावेळी मोदी यांनी विरोधकांना धडा शिकवण्याचे आवाहन बिहारच्या जनतेला केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पश्चिम चंपारण्य येथे चौथी सभा झाली. या सभेत बोलताना मोदी म्हणाले,”स्वातंत्र्य लढ्यावेळी जो निर्धार केला गेला होता, चंपारण्यला पुन्हा एकदा तसाच निर्धार करायचा आहे. जे आत्मनिर्भर बिहार व आत्मनिर्भर भारताच्या वाटेत जे अडथळा बनत आहेत, त्यांना लोकशाही मार्गाने धडा शिकवायचा आहे,” असे आवाहन मोदी यांनी केले.
“चंपारण्य ही भारताची आस्था व अध्यात्माची भूमी आहे. ही भूमी आपल्या सामर्थ्याला विशद करते. इथे बुद्धांच्या पाऊलखुणा आहेत. येथूनच भारताच्या स्वातंत्र्य आंदोलना नवी दिशा मिळाली होती. चंपारण्य ही बापूंच्या सत्याग्रहाची भूमी आहे. आज संपूर्ण देशाच्या सहकार्याने आणि सहभागातून अयोध्येत भव्य राम मंदिर उभे राहत आहे. पण अशा वेळीही तुम्हाला त्या लोकांना विसरायचे नाही, ज्यांनी प्रभू रामचंद्राच्या अस्तित्वारच प्रश्न उपस्थित केले. राम मंदिर उभारण्याच्या मार्गात अडथळे निर्माण केले” असे मोदी म्हणाले.