टीम लय भारी
नवी दिल्ली : महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपला सत्तेपासून वंचित ठेवल्यामुळे भाजपचे राज्यातील नेत्यांसह केंद्रातील नेते आजही चिंताग्रस्त झाले आहेत. भाजपचे एकामागून एक नेते शिवसेनेवर टीका करत राहतात. दोन दिवसांपूर्वीच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी शिवसेनेवर टीका केली होती. त्यानंतर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी शिवसेनेवर युती तोडल्याबद्दल टीका केली. सत्तेच्या लालसेतून शिवसेनेने भाजपला धोका दिला. असा आरोप केला.
भाजपशी शिवसेनेने युती केली. पण युतीनंतर सत्तेच्या लालसेतून भाजपला धोका दिला. मला विश्वास नाही बसत ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे” असा टोलाही राजनाथ सिंह यांनी लगावला आहे. “काँग्रेस नेते राहुल गांधी सांगतात की आम्ही महाराष्ट्रात सत्तेत आहोत, पण निर्णयात नाही. म्हणजे जेव्हा संकट येते, तेव्हा हे हात झटकतात” अशी टीका राजनाथ यांनी केली. मुंबईतील रुग्णालयांच्या परिस्थितीचा उल्लेख करत राजनाथ सिंह म्हणाले, “काही रुग्णालयांमध्ये जिथे मृतदेह पडलेले आहेत, तिथेच कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार होत आहेत. तिथे सरकार नावाची गोष्ट शिल्लक राहिली नाही का? सरकार आपली जबाबदारी झटकू शकत नाही. कोविडशी लढण्यासाठी आम्ही महाराष्ट्र सरकारला सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहोत” असे आश्वासन राजनाथ यांनी दिले.