राष्ट्रवादी कॉँग्रेसवर अजित पवार यांनी दावा केल्यानंतर शरद पवार समर्थक सक्रीय आले आहेत, म्हणूनच की काय राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीमध्ये राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज बोलवली होती. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार, शरद पवारांची लोकशाही पद्धतीने पुन्हा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल तसेच कोहली या तीन खासदारांसह 9 आमदारांना निलंबित करण्यात आलं आहे. अजित पवार यांनी पक्षावर दावा केलयावर शरद पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवून आम्हीच खरी राष्ट्रवादी कॉंग्रेस असल्याचे आयोगाला सांगितले होते. तर अजित पवार यांनीही आपलाच पक्ष अधिकृत असल्याचे सांगत, चिन्ह आणि पक्षाचे नाव आपल्याला मिळावे यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. या सगळ्या घडामोडी पाहता, राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.
राष्ट्रवादीच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत 8 ठरावांना मान्यता देण्यात आली. यामध्ये राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कार्यकारिणीनं शरद पवार यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केलं आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि केरळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष पीसी चाको यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्याचबरोबर राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएत सामिल झालेल्या महाराष्ट्रातील 9 आमदारांनाही निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे, असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले, आजची बैठक आमचं मनोधैर्य उंचावणारी होती. मीच राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष आहे. मी सध्या कार्यरत आहे जरी माझं वय 82 असेल किंवा 92 असेल. यापुढं आमचं जे काही म्हणणं असेल ते आम्ही निवडणूक आयोगापुढं मांडणार आहोत.
हे सुध्दा वाचा:
शिवसेना- राष्ट्रवादीनंतर आता भाजपात होणार बंड; पंकजा मुंडे कॉंग्रेसवासी होणार
सत्तेतील वाट्यासाठी रामदास आठवलेंचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना साकडे
अखेर ठरलं! चांद्रयान-3 या दिवशी लॉंच होण्याची शक्यता
पवार पुढे म्हणाले, अजित पवारांनी आपणच अध्यक्ष असल्याचा जो दावा केला आहे. मला त्याबद्दल माहीत नाही, मी राष्ट्रवादीचा अध्यक्ष आहे. त्यांच्या दाव्यात काही तथ्य नाही, सत्यता नाही. त्यांनी बैठकीबाबत जे म्हटलं आहे त्यात काही तथ्य नाही. सरन्यायाधिश धनंजय चंद्रचूड यांनी निर्णय देताना फक्त आमदार हेच पक्ष ठरवण्याचे निकष नाहीत, असं म्हटलं आहे. कोणाला काय बनायचं आहे, यावर मी बोलणार नाही. कोणाला पंतप्रधान बनायचंय कोणाला उपपंतप्रधान व्हायचं असेल. आमच्यासोबत कोणते आमदार आहेत हे लवकरच समजेल, असंही पवार यावेळी म्हणाले. ईडी, सीबीयचा वापर भाजपकडून पक्ष फोडण्यासाठी केला जात असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला.