शिवसेनेत फुट पडल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडल्याने शिवसेना नेमकी कोणाची असा वाद सध्या चिघळत चालला आहे. दोन्ही गटांपैकी कोणीच माघार घ्यायला तयार नाही म्हणून हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. या प्रकरणात आमदारांच्या अपात्रतेचा विषय आणि शिवसेनेचे निवडणूक चिन्ह अशा दोन्ही गोष्टींबाबत आज कोर्टात सुनावणी सुरू असून दोन्ही गटाच्या वकीलांकडून जोरदार युक्तीवाद सुरू आहेत. यावेळी युक्तीवाद करत असताना ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केलेल्या युक्तीवादावरून या प्रकरणाला आता वेगळीच कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ठाकरे गटाची बाजू मांडताना अॅड. कपिल सिब्बल म्हणाले, ‘निवडणूक आयोगाच्या कागदपत्रांनुसार उद्धव ठाकरे हेच 2018 ते 2023 या कालावधीपर्यंत शिवसेनेचे अध्यक्ष आहेत. तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांनी स्वेच्छेने पक्ष सदस्यत्व सोडलं आहे,’ असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे. तसंच एकनाथ शिंदे हे पक्षाचे प्राथिमक सदस्यही नव्हते. ते पक्षाच्या कार्यकारिणीत निवडून आलेले नव्हे तर नियुक्त केलेले होते, असा युक्तिवाद करत सिब्बल यांनी एकनाथ शिंदे गटाला दणका दिला आहे.
हे सुद्धा वाचा…
BMC News: महानगरपालिका मुंबई शहरातील पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी राबवणार नवीन उपक्रम
Sanjay Raut : संजय राऊतांचा कारागृहातील मुक्काम वाढला! न्यायालयाने जामीन अर्जावर दिले खास निर्देश
शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर सुद्धा एकनाथ शिंदे यांनी आपणच शिवसेना असल्याचा धोशा कायम ठेवला, इतकंच नव्हे तर आम्ही शिवसेना पक्ष सोडला नसून आमची शिवसेनाच मूळ पक्ष आहे असा दावा सुद्धा त्यांनी वारंवार करत निवडणूक आयोगाकडे अर्ज करत पक्षाचे चिन्ह मिळवण्याचे सुद्धा प्रयत्न सुरू केले. त्यांच्या या भूमिकेवर आज कोर्टाने सुद्ध सवाल करत शिंदे हे कोणत्या भूमिकेतून निवडणूक आयोगाकडे गेले होते अशी विचारणा केली, त्यावर पक्षाचा सदस्य म्हणून आम्हाला आयोगाकडे जाण्याचा अधिकार आहे असे म्हणून शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल यांनी पाठराखण केली, मात्र त्यावर प्रतिवाद करत शिंदे हे पक्षाचे प्राथमिक सदस्यच नसल्याचा दावाच सिब्बल यांनी यावेळी केला.
कपिल सिब्बल यांनी आपला प्रतिवाद कायम ठेवत पुढे म्हणाले, ज्यांनी स्वेच्छेने पक्षच सोडला आहे, ते पक्षाच्या चिन्हावर दावा करू शकत नाहीत असे म्हणून त्यांनी शिंदे गटाला धक्का दिला आहे. कोर्टात सुनावणीच्या वेळी शिंदे आणि ठाकरे गटाचे आपापली खिंड लढवत असले तरीही आज ठाकरे गटाच्या वकीलांनी चांगलीच बाजू लावून धरली असून कोर्टाकडून सुद्धा काही गोष्टींबाबत शहानिशा करण्यासाठी प्रश्न विचारण्यात आले, त्यामुळे कोणाच्या बाजूने आता हा निकाल लागणार याबाबत सगळ्यांची उत्सुकता ताणली गेली आहे.
राज्यातील सत्तांतराच्या खेळीत शिवसेनेत पडलेली फुट न भरून निघण्यासारखी आहे. त्यामुळे या सत्तेच्या या खेळात नेमकी कोण बाजी मारणार हेत पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.