लय भारी न्यूज नेटवर्क
मुंबई : अहमद पटेल व उद्धव ठाकरे यांच्यात काल रात्री बैठक झाली, तब्बल पाऊण तास या दोघांमध्ये चर्चा झाली. शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर अहमद पटेल यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली आहे. त्यामुळे शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचे सरकार स्थापन होण्याच्या दृष्टीने पाऊले पडत असल्याचे दिसत आहे.
तिन्ही पक्षांच्या सरकारचे स्वरूप कसे असेल. मुख्यमंत्रीपद व इतर मंत्रीपदे कोणाला किती दिली जातील. या शिवाय राज्यातील महापालिका, नगरपालिका व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या तिन्ही पक्षांचा सहभाग कसा असेल याबाबतही उद्धव व पटेल यांच्यात सविस्तर चर्चा झाल्याचे समजते. पटेल व इतर केंद्रीय नेत्यांनी सुरूवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी विस्तृत चर्चा केली. त्यानंतर पटेल यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली. या चर्चेत सत्तेचा फॉर्म्यूला निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांच्या वतीने सत्ता स्थापनेबाबत लवकरच अंतिम निर्णय होईल, असे बोलले जात आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसनेही आज सकाळीच प्रमुख नेत्यांच्या बैठकीचे आयोजन केले आहे. ही बैठक यशवंतराव चव्हाण सेंटमध्ये होणार आहे. या बैठकीत सत्तेच्या फॉर्म्यूल्याबाबत चर्चा होईल, असे सूत्रांनी सांगितले.
काँग्रेस आमदारांची आज होणार सुटका
जयपूर मुक्कामी असलेल्या काँग्रेसच्या आमदारांची आज सुटका होणार आहे. हे सगळे आमदार आज मुंबईत परततील किंवा आपापल्या मतदारसंघात रवाना होतील. सरकार स्थापनेबाबतच्या पत्रावर काँग्रेस आमदारांनी स्वाक्षरी केल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले.
हे सुद्धा वाचा
शिवसेनेला काँग्रेस – राष्ट्रवादी उल्लू बनवित आहे : नारायण राणे
शिवसेनेचा पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस – राष्ट्रवादीचे ‘तळ्यात मळ्यात’
राज्यपालांची भूमिका त्यांच्या टोपीच्या रंगाला साजेशी; काँग्रेसचा हल्लाबोल