टीम लय भारी
मुंबई : भाजपने आम्हाला फसविले. त्यामुळे ३० – ४० वर्षांपासून राजकीय विरोधक असलेल्या पक्षांबरोबर आम्ही सरकार स्थापन केले. पण याचा अर्थ आम्ही भगवा खाली ठेवला असा नाही. आमचे अंतरंगच भगवे आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वनिष्ठेची हमी दिली, अन् मनसेचे नाव न घेता टीकाही केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त वचनपूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ठाकरे बोलत होते. ठाकरे यांचा ज्येष्ठे शिवसैनिकांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला.
ठाकरे पुढे म्हणाले की, हा माझा सत्कार नाही. हा तुमचा सत्कार आहे. मी कुटुंबप्रमुख आहे. मी जबाबदारीपासून कधी पळ काढला नाही, काढणार नाही. आपण वचनपूर्तीच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. बाळासाहेबांचा हात हातात घेऊन मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचे वचन त्यांना दिले होते. ते वचन पूर्ण केले. आपला जुना मित्र भाजपने त्याच खोलीच शब्द दिला होता. तो शब्द खाली पाडला. मी नुसता उद्धव ठाकरे नाही. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. मी डरणारा नाही. तुमच्यासमोर मला भाजपने खोटे पाडले. प्राण गेला तरी बेहत्तर पण मी शिवसैनिकांशी आणि जनतेशी खोटे बोलणार नाही. ३० – ४० वर्षे जे विरोधक होते, त्यांच्याशी आम्ही सरकार स्थापन केले. पण याचा अर्थ असा नव्हे की, आम्ही भगवा खाली ठेवला. आमचा रंग बदललेला नाही. आमचे अंतरंगच भगवे आहे.
कट्टर हिंदूत्ववादी शिवसेनेशी यापूर्वी सुद्धा भाजपने युती तोडली होती. मी मुख्यमंत्री होईन असे वचन बाळासाहेबांना दिले नव्हते. शिवसैनिकांनी घाम गाळले. रक्त सांडले. त्यांच्या चरणी माझे यश समर्पित करतो. लढाईला मी घाबरत नाही. विरोधकांचे सोडून द्या, पण घरातल्यांनीही वार केले. पण जोपर्यंत शिवसैनिक सोबत आहेत तोपर्यंत मला कुणाची पर्वा नाही. तुम्ही माझ्यावरती, शिवसेनाप्रमुखांच्या पुत्रावरती विश्वास दाखवला. तो मी कधी वाया जाऊ देणार नाही. तुमचे उपकार मी याच जन्मी नव्हे तर जन्मोजन्मी विसरणार नाही, अशाही भावना उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केल्या.
हे सुद्धा वाचा
राज ठाकरेंची नवी गर्जना : हिंदूना नख लावाल, तर हिंदू म्हणून अंगावर जाईन
शेतकऱ्यांना अडचणी मांडण्यासाठी प्रत्येक तालुक्यात कक्ष, आलिबागमध्ये झाली सुरूवात
मनसेच्या नेतेपदी अमित ठाकरे यांची नियुक्ती, मनसेच्या नवा झेंड्याचेही अनावरण