मुंबईतील साखळी बाॅम्बहल्याचा सूत्रधार याकूब मेमन याच्या कबरीचे काम करून जतन करण्याचे काम महाविकास आघाडीकडून करण्यात आला असल्याचा खळबळजनक आरोप भाजप नेते राम कदम यांनी केला आणि राज्यातील राजकीय वर्तुळात उलट – सूलट चर्चा सुरू झाल्या आणि आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी सुद्धा सुरू झाल्या. या आरोपावर काॅंग्रसकडून सुद्धा प्रतिक्रिया आली असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी भाजपच्या या आरोपावर जोरदार हल्लाबोल करत जबराट पलटवार केला आहे. याकूबच्या कबरीच्या मुद्द्यावरून राजकीय पोळी भाजण्याचा भाजपाचा डाव असल्याचे म्हणत भाजपाने दहशवादाबद्दल बोलणे हेच मुळात हास्यास्पद आहे असे म्हणून लोंढे यांनी सडकून टीका केली आहे.
भाजप नेते राम कदम यांनी केलेल्या वक्तव्याचा काॅंग्रेसकडून समाचार घेण्यात आला आहे. यावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी प्रत्युत्तर देत भाजपचा डाव उधळून लावला आहे. या संपुर्ण प्रकरणाबाबत बोलताना अतुल लोंढे म्हणतात, भारतीय जनता पक्षाकडे देशातील मुख्य प्रश्नांवर उत्तर नसल्याने जाणीवपूर्वक धार्मिक मुद्द्यांना महत्त्व दिले जात आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीचा मुद्दा उपस्थित करून भाजपा धार्मिक वातावरण बिघडवण्याचे काम करत आहेत, असा आरोपच लोंढे यांनी भाजपवर केला आहे.
हे सुद्धा वाचा…
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात अतिरेक्याची समाधी…
याकूब मेमनच्या कबरीचे सुशोभीकरण वाईटच, पण नथूराम गोडसे….
पुढे अतुल लोंढे म्हणतात, शिवाय 2015 साली दहशतवादी याकूब मेमनचा मृतदेह भाजपा सरकारनेच त्यांच्या कुटुंबियांना दिला व त्याचा अंत्यंसंस्कार झाल्याचे सर्वांनी पाहिले. अतिरेक्याचा मृतदेह भाजपाने त्यांच्या कुटुंबियांना का दिला? याचे उत्तर भाजपाने द्यावे असे म्हणून लोंढेंनी भाजपला फटकारले आहे. कोणत्याही दहशतवाद्याचा मृतदेह कुटुंबीयांना देता येत नाही. काँग्रेस सरकारने दहशतवादी अफजल गुरू आणि मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबला फाशी दिल्यानंतर त्यांना अज्ञातस्थळी दफन केले. अतिरेक्यांचे समाजात उदात्तीकरण होऊ नये म्हणून काँग्रेसने खबरदारी घेतली होती, असे म्हणून काॅंग्रेसची भूमिका त्यांनी यावेळी सांगितली.
भाजपाच्या सरकारने मात्र 2015 साली दहशतवादी याकूब मेमनचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांना दिला. भाजपाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा व वरूण गांधी यांनी याकूब मेमनला फाशी देऊ नये म्हणून पत्रही लिहिले होते. यावर भाजपा माफी मागणार का? तसेच ज्यावेळी मृतदेह दफन केला जातो त्याच्या तीन वर्षानंतर त्याठिकाणी दफन केलेल्या ठिकाणी नागर वखर करण्यात येते, ती कबर खोदली जाते, माञ असे झाले नाही. कोणाच्या आशीर्वादाने हे झाले आहे याचे उत्तर भाजपने द्यावे असे म्हणत अतुल लोंढे यांनी थेट काही प्रश्नच भाजपला विचारले आहेत.
अतुल लोंढे म्हणतात, भाजपा सरकारने मात्र कुख्यात दहशतावादी मसूद अजहर याला सरकारी सुरक्षेत अफगाणिस्तानात सोडून देण्यात आले होते. संसदेवर हल्लाही भाजपा सरकारच्या काळात झाला होता. पठाणकोट हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या ISI या गुप्तहेर संघटनेला भारतात तपासासाठी येण्याचे निमंत्रण भाजपा सरकारनेच दिले होते. भाजपाने दहशवादाबद्दल बोलणे हेच मुळात हास्यास्पद आहे, असे म्हणत लोंढे यांनी यावेली मिश्किल टोला लगावला आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या काळात याकूब मेमनच्या कबरीची काळजी घेण्यात आली, तिथे चौथाऱ्यांचे काम करण्याच आले आहेत. एलईडी लाईट्स लावण्यात आले आहेत, शिवाय सुरक्षा रक्षक सुद्धा ठेवण्यात आले आहेत असे म्हणत असे का केले म्हणत उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राहुल गांधी यांच्याकडे राम कदम यांनी उत्तर मागितले आहे. राम कदम यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नाने राज्यातील वातावरण आणखी तापले असून यावर कोण आपली बाजू कशी मांडणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.