टीम लय भारी
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’च्या माध्यमातून राज्यभरात मोठ्या संख्येने महाविद्यालये उभारली आहेत. परंतु या महाविद्यालयांच्या इमारतींचे नुतनीकरण करणे, वसतिगृह सुविधा उपलब्ध करणे, अन्य सुविधांची तजवीज करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी १२० कोटी रुपयांची आवश्यकता असल्याची लेखी मागणी पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे. बनसोडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सुद्धा या संदर्भात भेट घेऊन त्यांच्याकडे सुद्धा पत्र सादर केले आहे.
‘रिपब्लीकन बहुजन विद्यार्थी परिषदे’चे अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे यांनी बुधवारी बनसोडे यांची भेट घेतली होती. कांबळे यांनी यावेळी ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’मार्फत चालविण्यात येत असलेल्या महाविद्यालयांच्या सध्याच्या दयनीय अवस्थेबद्दल बनसोडे यांना एक निवेदन दिले. कांबळे यांच्या या निवेदनाची बनसोडे यांनी लगेचच दखल घेतली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नावाने पत्र तयार केले. त्यानंतर बनसोडे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन त्यांच्याकडे हे पत्र सादर केले.
हे सुद्धा वाचा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची उभारणी धनंजय मुंडेच्या निगराणीखाली होणार