लय भारी न्यूज नेटवर्कट
मुंबई : मेट्रोच्या कारशेडसाठी शुक्रवारी रात्री सरकारने केलेल्या गुपचूप वृक्षतोडीमुळे सामान्य जनतेमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. संतापाचा कडेलोट झालेल्या जनतेने जोरदार आंदोलन करण्यास सुरूवात केली आहे. आता या आंदोलनात बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही उडी घेतली आहे.
रविवारी सकाळी 11 वाजता स्वतः प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे. आरे कॉलनीजवळ पवई – निटी गेट फिल्टर पाडा या ठिकाणी हे आंदोलन होणार आहे. मुंबईचे अध्यक्ष सुरेश शेट्टी व जोगेश्वरी विधानसभेचे उमेदवार दिलबाग सिंह यांची प्रमुख उपस्थिती यावेळी असेल, असे श्याम सोनार यांनी पाठविलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
मुंबईकरांना ऑक्सिजन पुरविण्याचे काम आरे जंगलातील वृक्ष करतात. पण या वृक्षांवरच कुऱ्हाड चालविली जात आहे. 50 – 100 वर्षे जुने वृक्ष तोडण्यात येत आहेत.
धक्कादायक म्हणजे, न्यायालयाने शुक्रवारी वृक्षतोडीविरोधातील सर्व याचिका फेटाळल्यानंतर राज्य सरकारने रातोरात गुपचूप झाडे तोडण्यास सुरूवात केली. या वृक्षतोडीला अनेक पर्यावरण प्रेमींनी विरोध केला. वृक्षतोडीविरोधात आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी बळजबरीने अटक केली आहे. सरकारच्या भूमिकेविरोधात जनमाणसांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. सरकारवर चौफेर टीका होत आहे.
सरकारच्या या बेफिकीरीविरोधात प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर भूमिका घेतली आहे. प्रकाश आंबेडकरांची मोठी ताकद असल्याने आता सरकारविरोधातील आवाज आणखी तीव्र होईल असा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला आहे.