टीम लय भारी
मुंबई : आदित्य ठाकरे पहिल्यांदाच आमदार झाले. लगोलग मंत्रीही झाले. आमदार व मंत्री म्हणून ते नवे आहेत. त्यामुळे त्यांना सरकारी कामाचे कितपत ज्ञान असेल याविषयी अनेकांकडून शंका कुशंका व्यक्त केल्या जात होत्या. पण आदित्य ठाकरे प्रचंड अभ्यासू आहेत, आणि उत्तम मार्गदर्शनसुद्धा करू शकतात. याची झलकच त्यांनी शनिवारच्या एका बैठकीत दाखवून दिली. त्यांच्या या अभ्यासू मार्गदर्शनावर आयएएस अधिकारीही फिदा झाले.
आदित्य ठाकरेंकडे पर्यावरण खाते आहे. या खात्याची शुक्रवारी त्यांनी सह्याद्री अतिथी गृहात आढावा बैठक घेतली. यावेळी पर्यावरण खात्याचे प्रधान सचिव अनिल डिग्गीकर, महाराष्ट्र प्रदुषण मंडळाचे अध्यक्ष सुधीर श्रीवास्तव व सदस्य सचिव ई. रवींद्रन हे तीन आयएएस अधिकारी उपस्थित होते. याशिवाय अन्यही अधिकारी उपस्थित होते. यावेळी आदित्य ठाकरे यांनी अधिकाऱ्यांकडून खात्यातील विविध विषय समजून घेतले. पण दुसऱ्या बाजूला त्यांनी अधिकाऱ्यांनाही विविध समस्यांविषयी मार्गदर्शन केले.
मुंबईत मिठी नदीच्या प्रदुषणाची मोठी समस्या आहे. ही समस्या दूर करण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रयत्न करीत आहे. आता मुंबई महानगरपालिकेच्या सोबतीने मिठी नदी प्रदुषण निवारणासाठी आपणही प्रयत्न केले पाहीजेत. माहूलमध्ये प्रदुषणाचा मोठा प्रश्न आहे. तेथील रहिवाशांना त्याचा त्रास होत आहे. या रहिवाशांना पर्यायी घरे इतरत्र देणे आवश्यक आहे. उल्हास नदी, कोल्हापूरची पंचगंगा अशा अनेक नद्यांमध्ये प्रदुषण खूपच वाढले आहे. त्यासाठीही उपाययोजना करायला हव्यात. प्लास्टीक बंदी आपण केली आहे. परंतु जे प्लास्टिक उत्पादक आहेत त्यांच्यासोबत बैठक घेऊन त्यांच्याशीही चर्चा करायला हवी. केंद्र सरकारकडे महाराष्ट्र सरकारने विविध प्रस्ताव पाठविले आहेत. या प्रस्तावांचा पाठपुरावा करून ते विषय मार्गी लावण्यात यावेत अशा विविध मुद्द्यांवर आदित्य ठाकरे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. पर्यावरण विषयांत आदित्य यांचा चांगला अभ्यास आहे. खात्याशी निगडीत विविध पर्यावरण समस्यांचाही त्यांनी अभ्यास केल्याचे उपस्थित अधिकारी वर्गाच्या निदर्शनास आले. त्यामुळे आदित्य ठाकरे या खात्याच्या माध्यमातून अनेक प्रभावी सुधारणा करतील अशा भावना व्यक्त करण्यात येत आहेत.
आदित्य ठाकरे गेल्या १० – १२ वर्षांपासून राजकारणात सक्रीय आहेत. नियोजनबद्ध काम करणे, योग्य लोकांची पारख करणे याची कला त्यांना चांगलीच अवगत आहे. पक्षाच्या बांधणीमध्येही त्यांचा मोठा वाटा आहे. निवडणुकीपूर्वी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता. त्यावेळी त्यांनी केवळ प्रचारावरच भर दिला नाही, तर त्या त्या भागातील वैशिष्ट्य, तेथील समस्याही जाणून घेतल्या. त्यामुळे या १० – १२ वर्षांत त्यांच्याकडे चांगलीच प्रगल्भता आली आहे. त्याचा उपयोग ते पर्यावरण व पर्यटन या त्यांच्या दोन्ही खात्यांमध्ये प्रभावीपणे करतील असे सूत्रांनी सांगितले.
हे सुद्धा वाचा
VIDEO : शाळकरी मुलांना अभियांत्रिकीची तोंड ओळख; राज्य सरकारचा ‘लय भारी’ उपक्रम !