लय भारी न्यूज नेटवर्क
मुंबई : अजित पवार यांना परत राष्ट्रवादीमध्ये आणण्यात अखेर यश मिळाले आहे. अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे सरकार उद्याच्या बहुमत चाचणीअगोदरच अल्प मतात आले आहे.
अजित पवार यांचे मन वळविण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते वारंवार भेटी घेत होते. शरद पवार यांच्या पत्नी प्रतिताभाताई तसेच जावई सदानंद सुळे यांनीही अजितदादांशी संपर्क साधला होता. प्रतिभाताईंचा अजितदादा फार आदर करतात. प्रतिभाताईंनी आईप्रमाणे अजितदादांवर प्रेम केलेले आहे. प्रतिभाताई राजकीय घडामोडींमध्ये कधीही सहभागी होत नाहीत. पण त्यांनी आपल्या घरातील सगळ्यांसोबतच कौटुंबिक जिव्हाळा जपलेला आहे. विशेषतः प्रतिभाताईंचे सर्वाधिक प्रेम अजितदादांवर आहे. अजितदादा कधीही प्रतिभाताईंचा शब्द खाली पडू देत नाहीत. त्यामुळे अजितदादांचे मन वळविण्यामध्ये प्रतिभाताईंनी मोठी भूमिका बजावली असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, आता थोड्याच वेळात – ३.३० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद आयोजित केली आहे. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा राजीनामा देतील असे बोलले जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचाही परिणाम
सर्वोच्च न्यायालयाने उद्या बहुमत सिद्ध करण्याचा निकाल दिला आहे. दुसऱ्या बाजूला अजित पवारांमागे आमदारांचा पाठिंबा राहिलेला नव्हता. अजितदादांबरोबर आलेले सगळे आमदार शरद पवारांकडे परत गेले होते. आमदारांचे पाठबळ राहिलेले नसल्यानेच अजित पवार यांनीच राजीनामा दिला असल्याचे बोलले जात आहे.