लय भारी न्यूज नेटवर्क
मुंबई : महंमद आली जीना नावाच्या व्यक्तीने नागरिक आणि धर्म यांची सांगड घालून देशाची एके काळी फाळणी केली होती. आता देशात नवे जीनाप्रेमी अवतरले आहेत. त्यांना देशाची आणखी एक फाळणी घडवून आणायची आहे, अशा शब्दांत अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी भाजप व नरेंद्र मोदी – अमित शाह यांचे नाव न घेता घणाघाती टीका केली.
भाजपप्रणीत केंद्र सरकारने लागू केलेल्या सुधारित नागरिक कायद्याविरोधात देशभरात आंदोलनाचा आगडोंब उसळला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानातही आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनामध्ये लाखो लोकांनी सहभाग नोंदवला. सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड, चित्रपट निर्माते फरहान अख्तर, जावेद जाफरी, जोया अख्तर, राज बब्बर, हुमा कुरैशी, सुशांत सिंह, शिवानी दांडेकर, नंदिता दास तसेच भाजप सरकार टीका करून राजीनामा देणारे आयएएस अधिकारी कन्नन गोपीनाथन आदी मान्यवर या आंदोलनात सहभागी झाले होते.
यावेळी स्वरा भास्कर म्हणाल्या की, गेल्या काही वर्षांत असे वाटत होते की, आपला भारत हरवला आहे, आणि भयानक न्यू इंडिया उदयास आला आहे. पण जुना भारत अजून जिवंत असल्याचे या तीव्र आंदोलनामुळे वाटू लागले आहे. एवढ्या मोठ्या संख्येने भारताचे लोक आंदोलनात उतरल्यामुळे मला आनंद वाटत आहे. हा गांधीजींचा भारत आहे. हा भगतसिंगांचा भारत आहे. मोहम्मद अली जिना नावाच्या व्यक्तीने नागरिक आणि धर्म यांचा संबंध जोडून भारताच्या इतिहासात सर्वात दुःखद घटना घडवून आणली होती. त्यांनी देशाची फाळणी केली होती. आता देशात नवे जीनाप्रेमी परत आले आहेत. त्यांना देशातील एका विभाजनावर समाधान नाही. आणखी एक विभाजन घडवून आणायचे आहे. आम्ही हे कधी घडवू देणार नाही. हा मोर्चा विरोधाचा नाही, तर समर्थनाचा आहे. संविधान आणि संवैधानिक मुल्यांच्या समर्थनार्थ हा मोर्चा आहे. महात्मा गांधींच्या भारताच्या समर्थनार्थ हा मोर्चा आहे. आपापसांतील बंधूभाव वाढीस लागण्याच्या दृष्टीने काढलेला हा मोर्चा असल्याच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, सीपीआय, जनता दल, छात्र भारती, सम्यक विद्यार्थी आंदोलन, भीम आर्मी आदी संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
यावेळी फरहान अख्तर म्हणाले की, अन्याय झाला असेल तर त्या विरोधात आवाज उठविण्याचा अधिकार भारतीय राज्य घटनेने दिलेला आहे. लोक आता आवाज उठवू लागले आहेत. लोकांच्या या भावनांना माझा पाठींबा आहे. सुधारित नागरिक कायद्यामध्ये पक्षपात झाला आहे. जावेद जाफरी यांनीही भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले. नागरिकत्व कायदा भयानक आहे. पोटापाण्याच्या प्रश्नांवर हे सरकार काहीच बोलत नाही. त्या ऐवजी राम मंदिरावर बोलत असल्याचे ते म्हणाले. आपण हिंसेचा मार्ग टाळून सत्य व अहिंसेच्या माध्यमातून आंदोलन केले पाहीजे असे सुशांत सिंह यांनी आवाहन केले. देशात अगोदर दंगली घडविण्यात आल्या. त्यानंतर झुंडबळी घेण्यात आले. आता देशाची फाळणी करण्यासाठी हा कायदा करण्यात आल्याचा संताप सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांनी व्यक्त केला.
हे सुद्धा वाचा
‘भाजपला भारत हिंदू राष्ट्र बनवायचे आहे, पण देशवासियांना हे मान्य नाही’