लय भारी न्यूज नेटवर्क
मुंबई : पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकरची मनधरणी करण्याचे प्रयत्न काँग्रेसने सुरू केले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उर्मिलाने सहभागी व्हावे अशी विनंती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी तिला केली आहे. यावर उर्मिलाने दोन दिवसांत निर्णय कळविण्याची भूमिका घेतली आहे. गायकवाड यांनीच पत्रकारांना ही माहिती दिली.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उर्मिला मातोंडकरने काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. चित्रपट क्षेत्रात नावाजलेल्या उर्मिलाने राजकारणात आल्याबरोबरच संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले होते. बोलण्यातील कसब तिच्याकडे आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षावर ती धारदार शब्दांत टीका करीत होती. तिच्या बोलण्याचा परिणाम सुद्धा लोकांवर होतोय असे वाटत होते. पण दुर्दैवाने तिला लोकसभा निवडणुकीत मोठे अपयश आले.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी योग्य काम केले नसल्याची लेखी तक्रार तिने तत्कालिन काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांच्याकडे केली होती. पण ही लेखी तक्रार चव्हाट्यावर आणल्याने त्यावर माध्यमांमध्ये चर्चा झाली. मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत लाथाळ्यांमुळे वैतागलेल्या उर्मिलाने अखेर महिनाभरापूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत असल्याची घोषणा केली.उर्मिला शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या वावड्याही उठल्या. पण आपण शिवसेनेत जाणार नसल्याचे स्पष्टीकरण स्वतः उर्मिलानेच केले. त्यानंतर आता तिने पुन्हा काँग्रेसमध्ये सक्रीय व्हावे यासाठी गायकवाड यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांना यात यश आल्यास काँग्रेसला निश्चितपणे फायदा होईल, असे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, चार दिवसांपूर्वी माजी मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले होते. काँग्रेसचे दिल्लीतील नेते चुकीच्या पद्धतीने तिकिट वाटप करीत आहेत. त्यामुळे मुंबईतील तीन – चार उमेदवार वगळले तर सगळ्याचे डिपॉझिट जप्त होईल, असा तोफगोळा त्यांनी डागला होता.