टीम लय भारी
मुंबई : ऑगस्ट महिन्यात ‘ध्येयाचा प्रवास’ या काव्य मैफिलीच्या अनुषंगाने आनंदवन व हेमलकसा येथे भेट दिली होती. त्यावेळेस बाबा आमटे यांच्या पुस्तकातून वाचलेले कार्य प्रत्यक्षात बघता आले. त्याच वेळेस ‘त्या’ दोघींनी संकल्प केला की, बाबांनी जो श्रम संस्कार रुजवला आहे तो विचार घेवून एक सायकल एक्सपिडीशन करावी, आणि तो प्रत्यक्षात आणलाही.
बाबांनी जो महारोग्यांच्या पुनर्वसनाचा वसा घेतला तो आजही तितक्याच तळमळीने तिसरी पिढी चालवत आहे. मुकबधीर, अंध व अपंग यांच्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान वापरून त्यांच्या विकासाचा मार्ग सुकर कसा होईल त्याबद्दल आनंदवनात अनेक उपक्रम चालवले जातात. असे उपक्रम शाळा कॉलेजांतील मुलांपर्यंत पोहोचवून त्यांच्यामधे प्रेरणा जागृत व्हावी या अनुषंगाने ही सायकल यात्रा आयोजित केली होती. पनवेल ते आनंदवन अशा ८०० किलोमीटर पल्ल्याची ही यात्रा सुनिता रामचंद्र (पनवेल) व सविता ननोरे (कांदिवली चारकोप) या दोघी १७ जानेवारी ते २५ जानेवारी या नऊ दिवसात पूर्ण केली. यातील उल्लेखनीय बाब म्हणजे, ही यात्रा पूर्ण करण्यासाठी सविता ननोरे जिद्दीने सायकल शिकल्या, व सातत्याने सराव करुन त्यांनी आपले उद्दिष्ट वेळेत पूर्ण केले.
मार्गात लागणाऱ्या अनेक शाळा कॉलेजमध्ये जावून त्यांनी बाबांच्या कार्याची माहीती दिली. तळेगाव, शिरूर, घोडेगाव, औरंगाबाद, सिंदखेडराजा, डोणगाव, कारंजालाड व कळंब असा दिवसाला ९० ते ९५ किमी प्रवास करत आनंदवनला त्या पोहोचल्या. तिथे त्यांचे अतिशय हृद्य स्वागत झाले. विकास आमटे, भारतीताई आमटे, शीतलताई आमटे, गौतमदादा यांनी स्वतः जातीने हजर राहून अभिनंदन केले.
प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमात सुनिता रामचंद्र यांनी लिहिलेला ‘अनफॉलो, अनफ्रेंड, अनब्लॉक’ हा कवितासंग्रह तेथील शकुंतला बारंगे या अपंग महिलेने आपल्या पायांनी प्रकाशित केला. विकास आमटे यांनी या दोघींचे कौतुक केले व सन्मानपत्र देवून सन्मानित केले.
हे सुद्धा वाचा
महाराष्ट्रात आठ करोना व्हायरस संशयित रूग्ण
वारसा हक्काने नोंद झालेली जमीन ब्राह्मण कुटुंबाने कसणाऱ्या धनगरांच्या नावे केली
शेतकऱ्यांना अडचणी मांडण्यासाठी प्रत्येक तालुक्यात कक्ष, आलिबागमध्ये झाली सुरूवात