दिल्लीतील फटाक्यांवरील बंदी उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला असून, दिवाळीच्या सुट्ट्यांपूर्वी या प्रकरणाची पुन्हा सुनावणी केली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, त्यांनी दिल्ली व एनसीआर भागासाठी सणासुदीच्या काळात “प्रदूषण” संदर्भात विशेष आदेश जारी केले आहेत आणि हा आदेश “अत्यंत स्पष्ट आहे.” भाजप नेते मनोज तिवारी यांनी फटाके बंदीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. दिल्ली सरकारने 1 जानेवारी 2023 पर्यंत सर्व प्रकारच्या फटाक्यांच्या विक्री, उत्पादन आणि वापरावर पूर्ण बंदी घातली आहे.
यावेळी शहरात फटाक्यांच्या ऑनलाइन विक्री आणि वितरणावरही बंदी असेल, असे दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी या निर्णयाची घोषणा करताना सांगितले होते. “यावेळी दिल्लीत फटाक्यांची ऑनलाइन विक्री/वितरण यावरही बंदी असेल. हे निर्बंध 1 जानेवारी 2023 पर्यंत लागू राहतील. बंदी कठोरपणे अंमलात आणण्यासाठी दिल्ली पोलिस, दिल्ली प्रदूषण नियंत्रण समिती (DPCC) आणि महसूल विभाग यांच्यासमवेत कृती आराखडा तयार केला जाईल,” असे राय यांनी ट्विट केले.
फटाक्यांची बंदी या वर्षी दिवाळी, नवीन वर्षाची संध्याकाळ आणि इतर अनेक सणांमध्ये लागू राहणार आहे. दरवर्षी, सणासुदीच्या काळात दिल्ली मध्ये हवेची गुणवत्ता खालावते त्यामुळे आपच्या (AAP) च्या सरकारने हा निर्णय घेतला आहे.
भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेच्या (Indian Institute of Tropical Meteorology) प्रारंभिक चेतावणी प्रणालीने राजधानीत मध्यम ते समाधानकारक हवेच्या गुणवत्तेचा अंदाज व्यक्त केला असला तरी दसऱ्याच्या दिवशी दिल्लीची हवेची गुणवत्ता खराब झाली. आयआयटीएमच्या अधिकार्यांनी सांगितले की, 5 ऑक्टोबर रोजी तापमान, वाऱ्याचा वेग आणि शेतातील आगीतून उत्सर्जन यांसारख्या बाबींमध्ये त्यांनी कोणतेही महत्त्वपूर्ण बदल नोंदवले गेले नाहीत. त्याशिवाय, “हायपरलोकल उत्सर्जन” मुळे हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो.
दरम्यान, गेल्या दोन वर्षांत फटाक्यांवर बंदी असूनही, दिल्ली व आजूबाजूच्या भागाच्या प्रदूषणाची पातळीमध्ये दिवाळीनंतरच्या आठवड्यातही काही विशेष फरक जाणवला गेला नाही.