महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या प्रचंड घडामोडी घडत आहेत. कधी काय होईल याचा अंदाज लावणे कठीण आहे. आधी शिंदेनी केलेला बंड आणि आता अजित पवार यांनी केलेले बंड यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संघर्ष सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यामुळे शिंदेच्या शिवसेनेत नाराजी असल्याचे दिसत आहे. अस असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी रात्री उशिरा नागपूरहुन मुंबईला परतले. यामुळे शिंदेचा नागपूर दौरा रद्द झाला आहे या चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आज गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठात कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार होते. रात्री उशिरा मुख्यमंत्री मुंबईला परतले. आज ते पुन्हा नागपूरला जाणार होते पण आत्ता त्यांचा नागपूर दौरा रद्द झाल्याची माहिती मिळत आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यासाठी काल संध्याकाळी (मंगळवारी) 7 वाजण्याच्या सुमारास त्यांचे नागपूरमध्ये आगमन झाले. आज त्या गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठात दीक्षांत समारंभ तसेच कोराडीतील सांस्कृतिक केंद्राच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपती पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर त्यांच्या हा पहिला विदर्भ दौरा आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी हे द्रौपदी मुर्मू यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. राष्ट्रपतींच्या स्वागतझाल्यावर त्यांना राजभवनात सोडल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे देखील नागपूरमध्ये थांबणार होते. पण राष्ट्रपती यांना राजभवनात सोडल्यानंतर मुख्यमंत्री तडकाफडकी मुंबईला रवाना झाले. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
हे सुद्धा वाचा:
पदभार सोडताच विभागीय आयुक्त निघाले पायी, साधेपणाचे सर्वत्र कौतुक
राहुलची कर्तबगारी चीनी दाम्पत्याला आवडली, संगमनेरमध्ये मुलीचे केले कन्यादान
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या शपथविधीनंतर शिंदे गटात नाराजीच वातावरण आहे. अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होणे शिंदे गटाच्या बऱ्याच आमदारांना आवडलेले नाही असे चित्र दिसत आहे. यातच शिंदेंचे मुख्यमंत्री पद जाऊन आत्ता अजित पवार मुख्यमंत्री होणार असे विरोधी पक्षाच्या नेत्याकडून बोलले जात आहे. त्यामुळे शिंदे आणि त्यांच्या आमदार यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली आहे का असा प्रश्न निर्माण होतो. यातच शिंदे यांनी नागपूर दौरा रद्द केल्यामुळे त्यांनी हा दौरा नेमका का रद्द केला असावा हा प्रश्न उभा राहतो.