शिवसेनेत फुट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यापक्षाने एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना अपात्र करण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे. गेली कित्तेक दिवस हा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे ठाकरे गटाने पुन्हा सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले असून यावर 14 जुलै रोजी सुनावणी होणार आहे, तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेच्या कारवाईबाबत आमदारांना नोटीस पाठवल्याने या घडामोडींना आता वेग आला आहे. अशातच विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मोठे वक्तव्य केल्याने शिंदे गटाची अस्वस्थता वाढली आहे.
गेल्यावर्षी शिवसेनेत फुट पाडून एकनाथ शिंदे यांच्यासह जवळापस 40 आमदारांनी भाजपसोबत हातमिळवणी करत राज्यात सत्तांतर घडवून आणले. त्यानंतर हा सत्तासंघर्षाचा लढा सर्वोच्च न्यायालयात अनेक महीने चालला. सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यामुळे आता शिंदे-फडणवीस सरकार बर्खास्त करु शकत नसल्याचे म्हटले. तसेच आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला आहे. आता शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांना घ्यावा लागणार आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर अद्यापही विधानसभा अध्यक्षांकडून याबाबत चालढकल होत असल्याचे म्हणत ठाकरे गट पुन्हा सर्वोच्च न्यायालयात गेला असतानाच विधानसभा अध्यक्षांनी ठाकरे आणि शिंदे गटाच्या आमदारांना नोटीस पाठवत सात दिवसांच्या आत उत्तर देण्यास सांगितले आहे. त्यातच 14 जूलै रोजी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे.
हा सर्व गदारोळ सुरु असताना गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील मोठा भूकंप झाला. अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर अनेक आमदार अजित पवार यांच्यासोबत गेले. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ देखील अजित पवार यांच्या गटात गेले आहेत. अजित पवार गट सरकारमध्ये आल्यामुळे शिंदे गटाच्या आमदारांमध्ये अस्वस्थता असताना आज नरहरी झिरवाळ यांनी माध्यमांशी बोलताना मोठे वक्तव्य केले आहे. आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्व बाजूंनी विचार केला तर शिवसेनेचे 16 आमदार अपात्र आहेत, मात्र याबाबत सर्व निर्णयाचे सर्व अधिकार विधानसभा अध्यक्षांना असल्याने मी त्याबाबत अधिक बोलणार नसल्याचे ते म्हणाले. त्यानंतर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी त्यांना प्रत्युत्तर देताना म्हटले आहे की, झिरवळांनी अपेक्षापेक्षा जास्त बोलू नये, जो अधिकार त्यांना नाही त्यावर त्यांनी बोलू नये असे त्यांनी म्हटले आहे.
हे सुद्धा वाचा
दिलीप वळसे-पाटील यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून यांना मिळणार उमेदवारी !
जगामध्ये नंबर एकचे पंतप्रधान असताना इतर पक्ष फोडण्याची गरज का; उद्धव ठाकरे यांचा सनसनीत टोला
पाऊस आला आणि पवारांना विरोध करणारा संपून गेला…
एकीकडे राष्ट्रवादी सत्तेत सामील झाल्यामुळे शिंदे गटाचे आमदार अस्वस्थ आहेत. मंत्रीपदाची आस लागून राहिलेले हे आमदार नाराज असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये येत आहेत. त्यातच झिरवाळ यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे शिंदे गट आणि अजित पवार गटामध्ये वादाची ठिणगी पडल्याचे दिसत आहे.