मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर त्यांच्या सोबत गेलेल्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करा अशी मागणी ठाकरे गटाकडून केली होती. पण सुप्रीम कोर्टाने 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार हे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना दिले होते. सुप्रीम कोर्टाच्या या सुनावणीला आता 3 महीने होतील, तरीसुद्धा विधानसभा अध्यक्षांनी कोणताही निर्णय दिलेला नाही. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसीवर उत्तर देण्यासाठी 2 आठवड्याचा कालावधी सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आला आहे.
16 आमदारांच्या अपात्रतेबाबत ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज ( शुक्रवारी ) सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना 2 आठवड्यात उत्तर देण्याची नोटिस बजावली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर आतापर्यंत 16 आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी अध्यक्षांकडून काय प्रक्रिया राबवण्यात आली या संदर्भात 2 आठवड्यात लेखी उत्तर द्यावे लागणार आहे. हा 2 आठवड्याचा काळ अध्यक्षांना फक्त त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी दिला असून या कालावधीत 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या निकालाची अपेक्षा करण्यात आलेली नाही.
हे सुद्धा वाचा:
आज चांद्रयान 3 अवकाशात घेणार भरारी, जाणून घ्या प्रक्षेपण कधी आणि कुठे पाहता येणार?
कदाचित दहा वर्षानंतरही भावनिक होऊ; राष्ट्रवादीसोबतच्या मैत्रीबाबत फडणवीस बोलले
मागच्या आठवड्यात अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिवसेनेच्या 40 आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांना म्हणणे मांडण्यासाठी नोटिस पाठवल्या होत्या. पण ठाकरे गटाने अपात्रतेबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करत सुप्रीम कोर्टाने अध्यक्ष राहुल नार्वेकरांना नोटीस बजावली आहे. या याचिकेवर एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांचे भविष्य अवलंबून आहे.