नवी दिल्ली : चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अनेक राष्ट्रांनी लॉकडाउन लागू केला. भारतातही कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर केंद्र सरकारनं लॉकडाउनचा निर्णय घेतला. सुरूवातीच्या २१ दिवसांच्या लॉकडाउननंतर तब्बल तीन वेळा त्याला मुदतवाढ देण्यात आली. आता केंद्र सरकारने लॉकडाउन शिथिल करण्यास सुरूवात केली असून, हा लॉकडाउन फेल (Lockdown failed) झाल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी स्पेन, जर्मनी, इटली, ब्रिटनसह भारताचा आलेख शेअर करत हा दावा केला आहे.
कोरोनाचा शिरकाव जगातील इतर राष्ट्रांमध्ये होत असल्यापासून काँग्रेसचे नेते राहुल गांधी याविषयावर आपली भूमिका मांडत आहे. केंद्र सरकारनं घेतलेल्या लॉकडाउनच्या निर्णयावरही त्यांनी सुरूवातीपासून केंद्राला काही सूचना केल्या होत्या. केंद्र सरकारने लागू केलेला लॉकडाउन पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका केली होती. जगातील इतर राष्ट्रांमध्ये लॉकडाउन हटवताना कोरोना बाधितांची संख्या कमी होत आहे. तर भारतात उलट चित्र आहे, असे ते म्हणाले होते. राहुल गांधी यांनी आता आलेख शेअर करून यावर भाष्य केले आहे.
This is what a failed lockdown looks like. pic.twitter.com/eGXpNL6Zhl
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 5, 2020
राहुल गांधी यांनी स्पेन, जर्मनी, इटली, ब्रिटनसह भारताचा आलेख ट्विट केला आहे. या राष्ट्रांमध्ये संख्या वाढत असताना लॉकडाउन लागू करण्यात आला. मात्र, लॉकडाउन हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर संख्या कमी होताना दिसत आहे. भारतात रुग्णांची संख्या वाढत असताना लॉकडाउन हटवण्यात आला आहे. असं या आलेखातून दिसते. या आलेखांबरोबर राहुल गांधी यांनी “हे अपयशी झालेल्या लॉकडाउनसारखं दिसत आहे,” असे म्हटले आहे.
लॉकडाउन केल्यानंतर राहुल गांधी यांनी सरकारला कोरोना चाचण्या वाढण्याची सूचना केली होती. लॉकडाउन कोरोना विषाणूला थांबवू शकत नाही. लॉकडाउन पॉझ बटनासारखा आहे. आपण कोरोनाच्या चाचण्या वाढवल्या तरच कोरोनाशी लढू शकतो. कोरोनामुळे देशात आणीबाणीसारखी स्थिती निर्माण झाली असून बेरोजगारीही वाढू लागली आहे, अशी भूमिका राहुल गांधी सातत्याने मांडत आहेत.