टीम लय भारी
शिर्डी : पावसाळ्यात मुंबई तुंबण्याची (Mumbai Flooded) विविध कारणे देतानाच अहमदाबाद व चेन्नईमध्ये पाणी तुंबते तेव्हा विरोधक गप्प का बसतात?, असा सवाल शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखात केला आहे. याला माजी मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर दिले आहे. ‘चेन्नई, अहमदाबादकडे बोट दाखवून मुंबईची जबाबदारी झटकू नका, मुंबई का तुंबली ते सांगा,’ असे विखे पाटील यांनी (Don’t point the finger at the other side, tell me why Mumbai is flooded says Vikhe-Patil) म्हटले आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना विखे यांनी शिवसेनेला उत्तर दिले आहे. ते म्हणाले, ‘मुंबईत गेल्या पंचवीस वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. या काळात त्यांना मुबंईचे प्रश्न का सोडविता आले नाहीत. दुसरीकडे बोट दाखवून आपले अपयश झाकता येत नसते. मुंबईत पाणी तुंबण्याचे अपयश तुमचेच आहे. अहमदाबाद-चेन्नईत कसे चालते, असा प्रश्न विचारून शिवसेना मुंबईतील जबाबदारी टाळू शकत नाहीत. हे अपयश तुमचेच आहे.
हजारो कोटी रुपये खर्च करूनही मुंबई कशी तुंबते? नालेसफाईत अनेकांनी आपले हात साफ करून घेतले आहेत,’ असा आरोपही विखे पाटील यांनी केला. आपण पूर्वी विधानसभेत हा विषय उपस्थित करून चौकशी करण्याची मागणी केली होती, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.