टीम लय भारी
मुंबई : मंदिरे उघडण्यासंबंधी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. शरद पवार यांनी यासंबंधी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांना पत्र लिहिले आहे. तसेच ट्विटरला त्यांनी हे पत्र शेअर केले आहे. यामध्ये त्यांनी राज्यपालांनी एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याला पत्र लिहिल्यासारखे भासत असल्याचे म्हटले आहे. तसेच राज्यपाल पदावर बसलेल्या व्यक्तीच्या वागण्याचा खेद वाटत असल्याचेही सांगितले आहे.
शरद पवारांनी पत्रात म्हटले आहे की, “सध्या आपण सर्वजण कोरोना संकटाशी लढत आहोत. कोरोनाला रोखण्यासाठी तुम्ही अंतर ठेवण्यासंबंधी घोषणा दिली होती. महाराष्ट्रात मुक्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वाखाली ‘माझं घर माझं कुटुंब’ मोहीम राबवण्यात आली असून लोकांना सोशल डिस्टन्सिंगबद्दल शिक्षण दिले जात आहे”. शरद पवारांनी यावेळी राज्यपालांनी लिहिलेल्या पत्राचा उल्लेख करताना राज्यात अनेक महत्त्वाची धार्मिकस्थळं असल्याचे म्हटले आहे. “सिद्धिविनायक, विठ्ठल मंदिर, शिर्डी साईबाबा मंदिर तसेच इतर ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळणे शक्य नसल्याचे,” त्यांनी सांगितले आहे.
“राज्यपालांचे एखाद्या मुद्द्यावर स्वतंत्र मत असू शकते हे मला मान्य आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपले मत व्यक्त केले याचेही कौतुक आहे. पण मीडियामध्ये हे पत्र प्रसिद्ध होणे आणि ज्या प्रकारची भाषा वापरली आहे ती पाहून आपल्याला धक्का बसला आहे,” असे शरद पवारांनी म्हटले आहे. शरद पवारांनी यावेळी राज्यपालांनी लिहिलेल्या पत्राची प्रतही जोडली आहे.