लय भारी न्यूज नेटवर्क
मुंबई : शिवसेना भाजपमध्ये सत्तास्थापनेवरून रस्सीखेच सुरु आहे. अशातच आता महायुतीमधील घटक पक्ष रिपब्लीकन पक्ष, रासप, रयत क्रांती संघटना व शिवसंग्राम या चारही पक्षांनी मंत्रीपदांची मागणी केली आहे.
रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले, शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे, रासपाचे महादेव जानकर, रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी आज बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीनंतर चारही नेत्यांनी पत्रकारांजवळ आपली मागणी व्यक्त केली.
निवडणुकीचा निकाल लागून आठ दिवस उलटले आहेत. महायुतीकडे बहुमत असतानाही सरकार स्थापन करण्याचा अद्याप दावा करण्यात आलेला नाही. सत्तेतील वाटा निश्चित करण्यावरून शिवसेना भाजपात संघर्ष सुरू आहे. त्यातच आता घटक पक्षांनीही दबक्या आवाजात आपली मागणी रेटण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सत्ता स्थापन होण्याआधीच चारही घटकपक्षांना मंत्रीपद देण्याची मागणी रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे.
यावेळी आठवले यांनी महायुतीचंच सरकार स्थापन व्हावं अशी इच्छा यावेळी व्यक्त केली. शिवसेनेने इतर विचार करु नये असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.