राज्यात आज दिवस अखेर एकूण २१५१ गावांमध्ये लंपी चर्मरोगचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण ४८,९५८ बाधित पशुधनापैकी एकूण २४,७९७ पशुधन उपचाराने बरे झालेले आहे. तर राज्यात आज अखेर १९१६ पशुधनाचा मृ्त्यू झाला आहे. उर्वरीत बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. राज्यात एकूण १०५.६२ लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे
महाराष्ट्रात आजअखेर जळगाव जिल्ह्यात ३२६, अहमदनगर जिल्ह्यात २०१, धुळे जिल्हयात ३०, अकोला जिल्ह्यात ३०८, पुणे जिल्ह्यात १२१, लातूरमध्ये १९, औरंगाबाद ६०, बीड ६, सातारा जिल्ह्यात १४४, बुलडाणा जिल्ह्यात २७०, अमरावती जिल्ह्यात १६८, उस्मानाबाद ६, कोल्हापूर ९७, सांगली मध्ये १९, यवतमाळ २, सोलापूर २२, वाशिम जिल्हयात २८, नाशिक ७, जालना जिल्हयात १२, पालघर २, ठाणे २४, नांदेड १७, नागपूर जिल्हयात ५, हिंगोली १, रायगड ४, नंदुरबार १५ व वर्धा २ असे एकूण १९१६ पशुधनाचा मृत्यू झाला आहे.
या जिल्ह्यांमध्ये लसीकरण पूर्ण –
दरम्यान अकोला, जळगांव, कोल्हापूर, वाशिम आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झाले आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सोमवारी रोजी ६ लक्ष लस प्राप्त झाल्या आहेत. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण यांची आकडेवारी नुसार महाराष्ट्रात सुमारे ७५.४९ टक्के गोवंशीय पशुधनाला लसीकरण झाले आहे.
हे सुद्धा वाचा –
Healthcare Facility: राज्यात ७०० ठीकाणी सुरू होणार ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’!
अफवा पसरवल्यास कारवाई –
पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी सर्व पशुपालकांना आवाहन केले आहे की, लंपी चर्मरोग आजार केवळ गाई व बैलांना होत असून त्याचा मानवी आरोग्याला कोणताही धोका संभवत नाही. या रोगाबाबत समाज माध्यमांमधून काही अफवा पसरविली जात असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. लंपी चर्मरोगावर उपयुक्त असणाऱ्या औषधींच्या उपलब्धतेसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत प्रत्येक जिल्हयासाठी १ कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.