कोरोना महामारीनंतर आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणाकडे सरकारने आपले लक्ष वेधल्याचे दिसत आहे. राज्य सरकारने सर्वसामान्य गोरगरीबांसाठी मुंबईत ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजना राबवली आहे. गांधी जयंती (२ ऑक्टोबर) पासून मुंबईत ही योजना सुरू झाली असून आता राज्यभरात ही योजना सरकार राबविणार आहे. राज्यात सुमारे ७०० ठिकाणी ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. एनडीटिव्ही वृत्तवाहिनीच्या ‘स्वस्थ बनेगा इंडिया’ या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, ज्येष्ठ पत्रकार प्रणव रॉय यांनी मुख्यमंत्र्यांसमवेत संवाद साधला. ‘राज्याची ग्रामीण आरोग्य यंत्रणा बळकट करणार असून, आरोग्य क्षेत्रासाठी दुप्पट निधी देणार आहे’ अशी ग्वाही मुख्यमंत्रीशिंदे यांनी यावेळी दिली.
मुंबईत ५० ठिकाणी आपला दवाखाने सुरू –
कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सर्वसामान्यांसाठी मुंबईत २२७ ठिकाणी ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ दवाखाने सुरू करण्यात येणार असून, त्यापैकी ५० दवाखाने २ ऑक्टोबरपासून सुरू झाले आहेत. सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेऊन आरोग्य संस्थांचे सक्षमीकरण केले जात आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहेत. आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी खासगी संस्थांच्या मदतीने आरोग्याच्या पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करण्यावर भर दिला जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
हे सुद्धा वाचा –
Eknath Shinde Camp: शिंदे गटातील आमदाराच्या गळ्यात भाजपचा दुपट्टा; चर्चांना उधाण…
‘ग्रामीण भागात आशा स्वयंसेविकांचे योगदान महत्वाचे’ –
मुख्यमंत्री म्हणाले, ज्या भागातील आरोग्य संस्थांचे काम ८० ते ९० टक्के पूर्ण झाले आहे, तेथे निधी उपलब्ध करून ते काम शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. राज्यात कॅथलॅब देखील सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामीण भागातील आरोग्याच्या क्षेत्रात आशा स्वयंसेविकांचे योगदान महत्वाचे आहे. कोरोना काळातही त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. त्यांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.