राज्यात मागील काही दिवसांपासून अपघाताचे प्रमाण खूपच वाढले आहे. समृद्धी महामार्गावर झालेल्या बसच्या अपघाताची घटना ताजी असतानाच आत्ता नाशिकच्या सप्तशृंगी गड घाटात बसचा भीषण अपघात झाला आहे. ही बस 400 फूट खोल दरीत कोसळली असून या मध्ये एक महिलेचा मृत्यू झाला आहे. तर 15 प्रवासी जखमी झाले असून बस चालक गंभीर जखमी झाला आहे. बसमध्ये एकूण 32 प्रवासी होते. स्थानिक आणि शासकीय यंत्रणाकडून मदतकार्य सुरू आहे.
खामगाव आगाराची ही बस काल ( मंगळवार) रोजी सप्तशृंगी येथे मुक्कामी होती. आज सकाळी ही बस गडावरुन खामगावच्या दिशेने निघाली असताना वणी येथील सप्तश्रृंगी गडावरुन उतरत असताना आज पहाटे 6.30 ते 6.50 च्या दरम्यान बसचा अपघात झाला. व बस 400 फूट दरीत कोसळली अपघाताची माहिती मिळताच सप्तशृंगी गडावरील नागरिकांनी आणि शासकीय यंत्रणाकडून मदतकार्य सुरू आहे. या बस अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना वणी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
हे सुद्धा वाचा:
अजित पवार यांना मंत्रालयातील 602 नंबरच्या केबिनचे भय
मोदी हे देशासाठी तर फडणवीस हे राज्यासाठी हानीकारक; काँग्रेसचा हल्लाबोल
दरम्यान, पालकमंत्री दादा भुसे यांनी या घटनेची माहिती मिळताच ते मालेगावहून सप्तशृंगी गडाकडे रवाना झाले. माध्यमांशी बोलताना मंत्री भुसे म्हणाले की, सप्तशृंगी घाटात एसटी बस अपघात झाला आहे. याची संपूर्ण माहिती घेतली असून यंत्रणेला सर्वतोपरी मदतीच्या सूचना दिल्या आहेत. बस अपघातातील जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. खामगाव डेपोची बस असून त्यातील 18 प्रवासी जखमी आहेत. गणपती पॉईंटजवळ वणी गड उतरत असताना हा अपघात झाला. अशी प्राथमिक माहीती आहे. अपघात ग्रस्तांची कुठलीही गैरसोय होणार नाही. यंत्रणेला सूचना दिल्या आहेत. तसेच मी स्वत: संपर्कात आहे. आणि सर्व परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. असे दादा भुसे म्हणाले.