राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचे आज दुपारी विशेष विमानाने शिर्डी साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होणार आहे. यामुळे शिर्डीमध्ये मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मंगळवारी संध्याकाळी नागपुरमध्ये दाखल झाल्या असून त्यांच्या स्वागतासाठी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर विमानतळावर उपस्थित होते. विदर्भात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. आज त्या शिर्डीमध्ये साईबाबांच्या मध्यान्ह आरतीला उपस्थित राहणार आहेत. साई दर्शनानंतर द्रौपदी मुर्मू यांचे साईबाबा संस्थानाच्या वतीने शाल आणि साईबाबांची मूर्ती देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
दरम्यान, साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन मंदिरातून बाहेर पडल्यानंतर ते गुरुस्थान मंदिर आणि साईबाबांच्या निंबाच्या झाडाला भेट देणार आहेत. त्यानंतर जिथे बाबांनी आयुष्यभर मुक्काम केला, त्या द्वारकामाई येथे नतमस्तक होणार आहेत. संग्रहालयात जाऊन साईबाबांनी वापरलेल्या वस्तू, कपडे, पादुका, रथ, पालखी, साईबाबांच्या मूळ प्रतिमा जतन केल्या तिथे भेट देतील. यानंतर त्यांचे साई संस्थानच्या प्रसादालयात भोजन होईल.
द्रौपदी मुर्मू साठी काल राजभवनावर राष्ट्रपतींसाठी विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तीन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्या आज शिर्डी साईबाबा मंदिर येथे दर्शन घेणार आहेत . मुर्मू या झारखंडच्या राज्यपाल असताना साईबाबांच्या दर्शनासाठी आल्या होत्या. आत्ता राष्ट्रपती झाल्यानंतर पहिल्यांदाच त्या शिर्डीला येणार आहेत. यामुळे शिर्डी मध्ये मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे. साईबाबा संस्थान आणि प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.
हे सुद्धा वाचा:
शिंदे- फडणवीस सरकारने, महिन्याभरात केल्या 39 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
शरद पवारच पुन्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष, तीन खासदारांसह 9 आमदार निलंबित
शिवसेना- राष्ट्रवादीनंतर आता भाजपात होणार बंड; पंकजा मुंडे कॉंग्रेसवासी होणार
मुर्मू यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीमध्ये सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आहेत. राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील हजर राहणार आहेत. तर राष्ट्रपतींच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत प्रचंड सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. त्यामुळे शिर्डीला छावणीचं स्वरुप आलं आहे. राज्यभरा तून तब्बल 1500 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला.