टीम लय भारी
कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची १९ वी ऊस परिषद कोल्हापूरमध्ये सोमवारी झाली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी शेतक-यांना मिळालेल्या मदतीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर नाराजी व्यक्त केली. तसेच येत्या ५ नोव्हेंबरला देशात किमान २ तास रास्ता रोको करणार, अशी घोषणा शेट्टी यांनी केली आहे.
‘मुख्यमंत्री नसताना जी मागणी केली ती मुख्यमंत्री असताना पूर्ण केली असती तर शेतकरी समाधानी झाला असता,’ असा टोला राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील एकही प्रदेश अतिवृष्टीतून सुटला नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी अडचणीत आला आहे. याला शेतकरी जबाबदार आहे का? जागतिक तापमान वाढीमुळे असे होत आहे, असे अभ्यासक सांगत आहेत. याला शेतकरी जबाबदार नसताना शेतक-यांनीच का भोगायचे? असा सवाल स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाच्या पाठीवर जाऊन ठामपणे मागणी केली पाहिजे. जे पर्यावरणाचा -हास करत आहेत, त्यांच्याकडून निधी गोळा करून जे पर्यावरण संतुलनासाठी काम करतात, त्यांना द्यायला पाहिजे, असे राजू शेट्टी म्हणाले.
ऊस तोडणी कामगारांनी आंदोलनाची हाक दिल्यानंतर काही नेत्यांनी पुढाकार घेतला आणि त्यांचा प्रश्न सोडविला. मग शेतक-यांना भाव मिळावा म्हणून का कोणी पुढाकार घेत नाही, असा सवाल करत राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे.