मनसेचा ठाकरे सरकारला सवाल
टीम लय भारी
मुंबई : बांगलादेशी नागरिकांना बेकायदेशीरपणे भारताचे नागरिकत्व मिळवून देणा-या एका टोळीला मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर महाराष्ट्र सरकार बांग्लादेशी घुसखोरांना (Intruder) केव्हा हुसकावणार?, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाविकास आघाडी सरकारला विचारला आहे.
बांगलादेशी घुसखोरांना बोगस आधारकार्ड आणि पासपोर्ट बनवून देण्याच्या सुविधा उपलब्ध करुन देणा-या दलालांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे स्थानिक पातळीवरची कागदपत्रे बनवण्यासाठी एमआयएमच्या दोन आमदारांच्या लेटरहेडचा वापर करण्यात आला आहे. याच मुद्द्यावरुन, मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन बांग्लादेशी घुसखोरांना कधी हाकलणार, असा सवालच राज्य सरकारला विचारण्यात आला आहे. महाराष्ट्रात बांग्लादेशियांचे जे अड्डे-मोहल्ले उभे राहत आहेत तेच भविष्यात त्रासदायक ठरणार; हे राजसाहेब वारंवार सांगत आहेत. त्यासाठी आम्ही मुंबईत महामोर्चाही काढला होता. आता या घुसखोरीला धर्मांधतेसह, राजकीय पाठबळही लाभतंय. महाराष्ट्र सरकार या घुसखोरांना केव्हा हुसकावणार?, असा सवाल मनसेने महाविकास आघाडी सरकारला विचारला आहे.
महाराष्ट्रात बांग्लादेशियांचे जे अड्डे-मोहल्ले उभे राहत आहेत तेच भविष्यात त्रासदायक ठरणार; हे राजसाहेब वारंवार सांगत आहेत. त्यासाठी आम्ही मुंबईत महामोर्चाही काढला होता. आता ह्या घुसखोरीला धर्मांधतेसह, राजकीय पाठबळही लाभतंय. महाराष्ट्र सरकार ह्या घुसखोरांना केव्हा हुसकावणार? https://t.co/FLuLUz3TLl
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) November 2, 2020
मनसेने यापूर्वीही बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध आपली भूमिका मांडताना एनआरसी कायद्याचे समर्थन केले होते. मनसेचा नागरीकत्व दुरुस्ती कायद्याला(सीएए) विरोधच आहे, मात्र बांगलादेशी, पाकिस्तानी घुसखोरांना हाकलणार्या नागरीकत्व नोंदणी कायद्याला (एनआरसी) पाठिंबा आहे. मनसेने बांगलादेशी, पाकिस्तानी घुसखोरांना देशातून हाकलून लावण्याच्या मागणीसाठी मोर्चाही काढला होता. मनसे कार्यकर्ते घुसखोरांच्या मुद्द्यावर यापूर्वीही आक्रमक झाले होते. त्यामुळेच विविध माध्यमातून ते आपला रोष या घुसखोरांच्या विरोधात व्यक्त करताना दिसतात.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे महामेळाव्यात पाकिस्तानी-बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध कडक भूमिका जाहीर केली होती. त्यानंतर मनसेच्या नेत्यांनीदेखील स्थानिक पातळीवर आक्रमक होत जोरदार विरोध केला. मुंबई उपनगर आणि पनवेल परिसरातील मनसेच्या पदाधिका-यांनी बांग्लादेशी घुसखो-यांना देशातून निघून जाण्याचा इशारा दिला.
दरम्यान, मनसे नेते अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत कृष्णकुंज इथे मनसे वर्सोवा शाखाअध्यक्ष प्रशांत राणे यांनी पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसखोरांनो चालते व्हा, असा लिहिलेला केक कापला होता. प्रशांत राणे यांनी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त हा केक बनवला होता. मनसे नेते अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत तो केक कापण्यात आला होता.
एमआयएमच्या ‘त्या’ दोन आमदारांना अटक करण्याची भाजपची मागणी
धक्कादायक…
बांग्लादेशींना नागरिकत्व मिळून देण्यासाठी वापरले MIM च्या आमदारांचे लेटर हेड…
देशाच्या सार्वभौमत्व व सुरक्षेशी अत्यंत धोकादायक खेळ करणाऱ्या देश विघातक षड्यंत्राची कसून करा, देशद्रोह्यांना अटक करा… pic.twitter.com/puYj74K4sR— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 2, 2020
बांगलादेशी नागरिकांना बेकायदेशीरपणे भारताचे नागरिकत्व मिळवून देणा-या टोळीकडून मुंबई पोलिसांनी एमआयएमच्या दोन आमदारांची स्वाक्षरी असलेली लेटरहेड्स जप्त केली आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खलील आणि शेख आसिफ शेख रशीद या दोन्ही आमदारांना अटक करण्याची मागणी केली आहे. कायमच बेकायदेशीर आणि देशविघातक कृत्यं करणा-या एमआयएमचा देशद्रोही चेहरा पुन्हा एकदा उघड झाल्याचा आरोपही भातखळकर यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे द्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
MIM च्या आमदारांचा घातक खेळ…
देश विघातक षड्यंत्राची कसून चौकशी झाली पाहिजे… लाचार ठाकरे सरकार हे प्रकरण खणून काढेल काय? pic.twitter.com/Mv8anbhRp6— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 2, 2020
वंदे मातरमला विरोध, कलम ३७० हटवण्याला विरोध, नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध, एनआरसीला विरोध करणाऱ्या ओवैसी व त्यांच्या पक्षाने आता आपले मतदार वाढवण्यासाठी बांग्लादेशी नागरिकांना बेकायदेशीररित्या भारताचे नागरिकत्व देण्याची मोहीम हाती घेतली आहे का? असा घणाघाती सवाल देखील अतुल भातखळकर यांनी केला आहे.
बांग्लादेशींना नागरिकत्व मिळून देण्यासाठी वापरले एमआयएमच्या 2 आमदारांचे लेटर हेड
भारताचा बांग्लादेश बनवण्याचा जणू काही लोकांनी चंगच बांधलाय की काय? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. कारण, मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या 2 एजंटच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईपासून ते नाशिक, पुणे, नागपूर आणि भारतातील सर्व महत्त्वाच्या शहरांमध्ये बांग्लादेशींना भारतीय नागरिकत्व मिळवून देण्याकरता बनावट सरकारी दस्तावेजांचा वापर केला जात होता आणि हे बनावट सरकारी दस्तावेज बनवण्याकरता आमदारांच्या लेटर हेडचा वापर केला जात होता. कुणीही या भारताचे नागरिकत्व घ्या, कोणतीही अट नाही. प्रतिबंधित देशांच्या नागरिकांनाही भारतात सहज नागरिकत्व दिले जातेय आणि ते ही सर्व कायदे पायदळी तुडवून. हे मुंबईतल्या साकीनाका पोलिसांनी उघडकीस आणले आहे.
भारतातील सर्व महत्त्वाच्या शहरांमध्ये बांग्लादेशींना भारतीय नागरिकत्व मिळवून देण्याकरता बनावट सरकारी दस्तावेजांचा वापर केला जातो आहे. ही एक आंतरराष्ट्रीय टोळी असून फक्त बांग्लादेशींना नाही तर अशा देशांच्या नागरिकांना भारतीय नागरिकत्व दिले जातेय जे देश भारतावर दहशतवादी हल्ले करतात. त्यामुळे देश मोठ्या दहशतवादी हल्ल्याच्या उंबरठ्यावर आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
मुंबई पोलिसांनी 155 आधार कार्ड, 34 पासपोर्ट, 28 पॅन कार्ड, 8 रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, 187 बँक आणि पोस्टाचे पास बुक, 19 रबर स्टॅम्प आणि 29 शाळा सोडल्याचे दाखले जप्त केले आहेत. ही सर्व कागदपत्रे बनावट आहेत आणि धक्कादायक म्हणजे, हे सरकारी दस्ताऐवज ज्यांचे आहेत ते भारतीय नागरिक नसून बांग्लादेशी नागरिक आहेत. मुंबई पोलिसांच्या साकीनाका पोलिसांनी अटक केलेल्या 2 एजंटकडून हा धक्कादायक खुलासा झाला. या 2 एजंटकडून साकीनाका पोलिसांनी 7 लेटर हेड जप्त केले आहेत जे एमआयएमचे आमदार मुफ्ती मुहम्मद इस्माईल अब्दुल खालीख आणि आमदार शेख असिफ शेख रशीद यांचे आहेत. ज्यांच्या साह्यायाने बांग्लादेशी नागरिकांना रेशनकार्ड, बँक खाते आणि पोस्टातील खाती उघडून त्यांचे प्राथमिक सरकारी दस्तावेज बनवले जात होते. आणि याच बनावट प्राथमिक सरकारी दस्तावेजांचा वापर करुन आधारकार्ड, पासपोर्ट, पॅनकार्ड आणि मतदान ओळखपत्र बनवले जात होते.