(नेत्वा धुरी)
आला आषाढ श्रावण
आल्या पावसाच्या सरी
किती चातक चोचीने
प्यावा वर्षा ऋतू तरी..
असे पावसाचे, त्यातल्या त्यात श्रावणाचे वर्णन कविवर्य बा. सी. मर्ढेकर यांनी केले आहे. सगळ्यांना हवहवासा वाटणारा ऋतू म्हणजे श्रावण. ऊन आणि पावसाचा लपंडाव असे निसर्गाचे विभ्रम आपल्याला याच ऋतूत पहायला मिळतात. गणराजाचे आगमन मराठी महिना भाद्रपदात होत असते. तसेच यंदा सप्टेंबर महिन्यात गणपती बाप्पाच्या आगमनासह भारतीय सणांना लागोपाठ सुरुवात होत आहे. दहीहंडीपासून गणपतीसारखे महत्वाचे सण यंदा सप्टेंबर महिन्यात सुरु होत आहेत. ऑगस्ट महिन्यात नागपंचमी, रक्षाबंधन सणानंतर सप्टेंबर महिन्यात सामूहिक सण सुरु होत आहेत. गणेशोत्सव हा सण प्रत्येक जण यथाशक्ती साजरा करतो, पण वाढत्या महागाईमुळे आपले बजेट या सणात कोलमडणार असल्याची शक्यता आहे.
हे सुद्धा वाचा
पोलिसांनीच केली चोरी!
शाहरुखला हवीय आलिया भट…आलियाची आतुरता वाढली…
राहुल गांधींनी पुन्हा दांडपट्टा फिरवला !
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्याची सुरुवात रविवारी संकष्टी चतुर्थीने होईल. 6 सप्टेंबरला बुधवारी श्रीकृष्णजयंती तर दुसऱ्या दिवशी गोपाळकाळाचा उत्सव असेल. 10 तारखेला रविवारी अजा एकादशी असेल. चार दिवसांनी गुरुवारी 14 सप्टेंबर रोजी बैलपोळा साजरा केला जाईल. त्याच दिवशी दर्श अमावस्या असेल. 18 सप्टेंबरला सोमवारी हरतालिका असेल. तर दुसऱ्या दिवशी गणपतीचं आगमन होईल. 28 सप्टेंबरला महिन्याअखेरीस अनंत चतुर्दशी असेल. 26 सप्टेंबरला मंगळवारी भगवत एकादशी असेल.
देशभरात श्रीकृष्ण जयंती आणि गणपती उत्सव दणक्यात साजरा केला जातो. कोरोनाचे सावट दूर झाल्यानंतर आता सण साजरे करताना कोणत्याही मर्यादा नाही. त्यामुळे श्रावण महिन्यात आता दणक्यात सण साजरे करता येणार आहेत. राज्यात गेल्यावर्षी डबल इंजिन सरकार होते, पण आता अजित पवार यांनी भाजपशी जुळवून घेत, उपमुख्यमंत्री, अर्थ खात्याचे मंत्री पद पदरात पाडून घेतले आहे. त्यामुळे अजित पवार गटाची मंडळी दहीकाला उत्सव आणि गणेशोत्सव काळात आपल्या ‘दादानेत्या’ची प्रसिद्धी पोस्टर, बॅनरच्या माध्यमातून करणार आहे.
या दोन्ही सणाच्या माध्यमातून अजित पवार गटाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आगामी निवडणुकीसाठी आपली ‘सोय’ पाहणार आहेत. असे असताना एकनाथ शिंदे यांचा गटही शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने वर्षभरात केलेल्या कामांची जंत्री देखाव्यातून मांडणार आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गट ’50 खोके’ या थीमवर देखावे उभारण्यासाठी गल्ली बोळातील मंडळांना ‘अर्थ’ पूर्ण प्रोत्साहन देणार आहे. माजी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या संघर्ष या सामाजिक संस्थेचा दहीकाला उत्सव ‘ग्लोबल’ असतो. यंदा ते काय नावीन्यपूर्ण कार्यक्रम करतात, हे पाहणे उत्सुकतेचा विषय झाला आहे.