टीम लय भारी
मुंबई :- महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाची रोजची आकडेवारी ५० हजारांवर पोहोचली आहे. त्यामुळे सरकारने ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लावले आहेत. परंतु, व्यापरी वर्गाकडून मोठ्या प्रमाणात निर्बंधांना विरोध होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी फेसबुक लाइव्हद्वारे राज्यातील जनतेसोबत संवाद साधला आहे. जनतेच्या जीवाच्या दृष्टीने राज्य सरकार कठोर निर्णय घेत आहेत. त्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे, असे आवाहन शरद पवारांनी केले आहे.
‘राज्यातील वैद्यकीय कर्मचारी अहोरात्र झटत असून परिस्थीती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. राज्य सरकारला नाईलाजाने कठोर निर्बंध करावे लागत आहेत, याला दुसरा पर्याय नाही. केंद्र सरकारचे ही हेच म्हणणे आहे. केंद्र सरकार राज्याला सहकार्य करण्यास तत्पर आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन जाधव यांच्याशी मी संपर्क साधला. त्यावेळी संपूर्णपणे महाराष्ट्राच्या पाठिशी असल्याचे केंद्राने सांगितले आहे,’ असे ही शरद पवारांनी म्हटले आहे.
कामगार, शेतकरी, व्यापारी, सर्वसामान्य सर्वानाच या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. कित्येकांना आर्थिक झळ बसते आहे. या परिस्थितीला धैर्याने सामोरे गेले पाहिजे, त्याला पर्याय नाही. समाजातील प्रत्येक घटकाला माझी विनंती आहे. आपण वास्तव स्विकारायला हवे. जनतेच्या दृष्टीने राज्य सरकार कठोर निर्णय घेत आहेत. त्यासाठी सर्वाचचे सहकार्य अपेक्षित आहे,’ असे आवाहन शरद पवारांनी केले आहे.