टीम लय भारी
मुंबई : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या दालनात सोमवारी खच्चून गर्दी झाली होती. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेकजण आपल्या समस्या घेऊन आले होते. त्यात ग्रामीण भागातील काही महिलाही आपले गाऱ्हाणे घेऊन आल्या होत्या. केविलवाण्या स्वरात या माता भगिनींनी आपल्या समस्या सांगण्यास सुरूवात केली. थोरात यांनी त्यांचे म्हणणे ऐकले. एवढेच नव्हे तर, महिलांच्या या समस्यांचा मुळापासून तपास करण्याच्या सुचना थोरात यांनी आपल्या कार्यालयातील एका अधिकाऱ्यांना दिल्या.
‘या महिला सांगत असलेल्या समस्यांची संपूर्ण माहिती घ्या. समस्यांचे मूळ शोधा. त्यावर काय उपाय करता येतील ते पाहा, आणि दोन – तीन दिवसांनंतर याबाबतचा संपूर्ण तपशील माझ्यासमोर सादर करा’ अशी सुचना थोरात यांनी आपल्या कार्यालयातील या अधिकाऱ्याला दिली. किंबहूना या महिलांना न्याय देण्याची जबाबदारीच या अधिकाऱ्यांवर थोरात यांनी सोपविली.
विशेष म्हणजे, कमी वेळ असूनही थोरात यांनी समस्या घेऊन आलेल्या प्रत्येक व्यक्तीची निवेदने स्विकारली. गर्दी आहे म्हणून त्यांनी लोकांमधून काढता पाय घेतला नाही. दिनवाण्या चेहऱ्याने अस्सल व गंभीर समस्या घेऊन आलेल्या त्या महिलांचे म्हणणे ऐकण्यासाठी मात्र थोरात यांनी पुरेसा वेळ दिला.
गंमतीचा भाग म्हणजे, या माता भगिनींची गंभीर समस्या समजून घेऊन त्यावर उपाय शोधण्याची सुचना थोरात यांनी अधिकाऱ्यांनी केली. तेव्हा या महिला म्हणाल्या की, साहेब तुम्हीच उपाय शोधला तर बरे होईल. या भोळ्या महिलांना प्रशासकीय कामाची पद्धत माहित नसल्याने त्यांनी थोरातांकडेच हा आग्रह धरला होता. त्यावर थोरात म्हणाले की, तुमची समस्या मीच सोडवणार आहे. हे अधिकारी तुमच्या समस्याचा अभ्यास करतील, त्यानंतर मी या अधिकाऱ्यांकडून माहिती घेईन, आणि तुम्हाला न्याय द्यायचा प्रयत्न करेन, अशा शब्दांत थोरात यांनी दिलासा दिला, अन् इवलासा चेहरा केलेल्या महिलांच्या चेहऱ्यावर हसू फुलले.
ग्रामीण, कष्टकरी जनतेविषयी थोरात यांना तळमळ
खेड्यापाड्यातील व्यक्ती, कष्टकरी यांच्याविषयी थोरात यांना कमालीची तळमळ आहे. यापूर्वी त्यांनी कृषी, शिक्षण, महसूल अशा विविध खात्याचे मंत्री म्हणून काम केले होते. तेव्हाही खेड्यातला माणूस समस्या घेऊन आला की, ते त्याला न्याय द्यायचा प्रयत्न करायचे. खेड्यातून मुंबईत येवून प्रगती केलेल्या तरूणांविषयी तर थोरात यांना फार अप्रुप आहे. अशा तरूणांचे ते तोंड भरून कौतुक करतात, अन् प्रोत्साहनही देतात.
हे सुद्धा वाचा
अनिल देशमुखांच्या दिमतीला आर. आर. आबांचा शिलेदार
भाजपला दणका : बिहारमध्ये CAA- NRC लागू होणार नाही : नितीश कुमार