31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमुंबईबाप्पा, तुझा विसर न व्हावा..!

बाप्पा, तुझा विसर न व्हावा..!

संपूर्ण राज्यात आज लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातोय. मुंबईसह ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांत समुद्र किनाऱ्यावर तर इतरत्र तलाव, कुत्रिम तलावात विसर्जनासाठी गर्दी झाली आहे. तर पर्यावरणस्नेहींकडून घराच्या घरीच बाप्पाचं विसर्जन केले जात असल्याचं चित्र आज संपूर्ण महाराष्ट्रात आहे. मुंबईत सकाळपासून मोठ्या मंडळांच्या विसर्जन  मिरवणुका सुरू असून उद्या (२९ सप्टेंबर) सकाळी त्यांच्या महाकाय मूर्तींचे विसर्जन होईल. लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, गणेशगल्लीतील मुंबईचा राजा आदी सार्वजनिक मंडळांच्या मंडपात विराजमान झालेल्या बाप्पांची सकाळपासूनच विसर्जन मिरवणूक सुरू झाली आहे. मुंबईतील सर्व चौपाट्यांवर भाविक आणि पर्यटकांची गर्दी उसळलेली दिसते. आणि सर्वांचे चेहरे बाप्पाच्या दर्शनामुळे प्रफुल्लीत झाल्याचेही दिसत आहेत.

राज्यभरातील भाविकांमध्ये उत्साह

मुंबईप्रमाणेच, ठाणे, पुणे, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, सातारा, सांगली, विदर्भासह उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातही बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणुकांमुळे सर्व रस्ते भाविकांनी फुलून गेलेत. बाप्पाची आरती, बाप्पाच्या नावाचा जप, विसर्जनासाठी ढोलताशांचा गजर यामुळे संपूर्ण राज्यातील वातावरण प्रसन्न झाले आहे. सगळीकडे उत्साह दिसून येतोय.

निरोप देताना भाविक भावूक

भाविकांकडून १० दिवसांचा पाहुणचार घेतल्यानंतर बाप्पाला निरोप देताना सर्वजण भावूक होत आहेत. विशेषता घरगुती गणेशमूर्तीचं विसर्जन करताना सर्व कुटुंबीय भावूक होत असल्याचं दृष्य सर्वत्र दिसत आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, १-२-३-४ गणपतीचा जयजयकार या घोषणांनी चौपाटी, तलावाकडे जाणारे रस्ते फुलून निघालेत.

पोलीस, महापालिकेमुळे भाविकांची सोय

मुंबईत गणेश विसर्जनासाठी पोलिसांनी चोख आणि कडक बंदोबस्त ठेवला आहे. शिवाय त्यांच्या मदतीला होमगार्डस, विविध स्वयंसेवी संस्था, पोलीस मित्र देखील आहेत. हे कमी म्हणून की काय, मुंबई महापालिकेचे तब्बल १० हजार कर्मचारीही गणेश विसर्जनाच्या कार्यात मदत करत आहेत. महापालिकेने भाविकांच्या सुविधेसाठी ७१ नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. तसेच १९८ कुत्रिम तलावांची सुविधा निर्माण केल्यामुळे भाविकांची मोठी सोय झाली आहे.

हे ही वाचा

लालबागच्या राजाची जल्लोषात विसर्जन मिरवणूक – LIVE

इर्शाळवाडीतील अनाथ बालकांना एकनाथ शिंदेंनी भरविले मोदक !

पीओपी मूर्तीचे ठाणे खाडीत थेट विसर्जन; २ आठवड्यात अहवाल सादर करा: हरीत लवाद

बाप्पाच्या दर्शनासाठी वरूणराजाचे आगमन

दरम्यान, राज्यात गणपती विसर्जनाची धामधूम सुरू असतानाच हे दृष्य पाहण्याचा मोह वरूणराजालाही आवरला नाही. त्यानेही दुपारपासूनच अंधार करून बरसायला सुरुवात केली. त्यामुळे दुपारच्या वेळी मुंबईत जोरदार पाऊस कोसळला. राज्यातील अनेक भागांत विजांच्या कडकडासह पावसाने हजेरी लावली. गणेशोत्सवाच्या काळात यंदा पावसाने नियमित हजेरी लावली. त्यामुळे कोरडे राहिलेले राज्यातील अनेक भाग ओलेचिंब झालेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी