यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे, मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी इर्शाळवाडीवर काळरात्रीने आघात केला. या वाडीवर दरड कोसळल्याने गाव होत्याचा नव्हता झाला. अनेक बालके अनाथ झाली. गणेशोत्सवात या बालकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर बोलवून त्यांच्यासोबत गणपती बाप्पाची आरती केली. आदिवासी मुलांना आपल्या हाताने मोदक भरविले. बाळगोपाळांनी केलेल्या गणपती बाप्पाच्या गजराने वर्षा बंगल्याचा परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. ‘प्रजा हीच राजा..मी सेवेकरी’ या ओळीचा प्रत्यय देणारे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या कृतीतून सामान्यांचे मुख्यमंत्री असल्याची प्रचिती देतात.
मंगळवारी (दि.26) रोजी संध्याकाळी वर्षा निवासस्थानी विविध देशांचे मुंबईतील वाणिज्यदूत, माध्यमांचे संपादक, प्रतिनिधी यांनी गणेश दर्शन घेतले. सायंकाळच्या आरतीसाठी खास पाहुणे निमंत्रित होते ते म्हणजे इर्शाळवाडीतील बांधव. त्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी समन्वयन केले. यावेळी इर्शाळवाडी दुर्घटनेदरम्यान मदत कार्यात मोलाची कामगिरी बजावणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. भावनिक बंध जोपासणाऱ्या या क्षणांचे साक्षीदार ठरले विविध देशांचे वाणिज्यदूत.
गेल्या काही दिवसामध्ये ‘वर्षा’वरील श्री गणरायाचे दर्शन आणि आरतीसाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली आहे. काल दुपारी त्र्यंबकेश्वरमधील आधार आश्रमातील मुलांनी वर्षा निवासस्थानी टाळ-मृदुंगाच्या गजरात आरती केली. त्यानंतर सायंकाळी इर्शाळवाडीतील बांधव सहभागी झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्या पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, स्नुषा वृषाली आणि नातू रुद्रांश हे या बाळगोपाळांसमवेत रमले. गळ्यात टाळ घालून मुख्यमंत्री ह्या मुलांसोबत आरतीसाठी उभे होते.
मुख्यमंत्री प्रत्येक मुलाला बोलावून त्याच्या हातात आरतीचं तबक देत होते. यावेळी इर्शाळवाडीतील ग्रामस्थांसह प्रशासकीय अधिकारी, माध्यम प्रतिनिधी याच्याबरोबरच काही देशांचे वाणिज्यदूत देखील उपस्थित होते. त्यांच्या हाताने देखील आरती करण्यात आली. एका वेगळ्या अनुभवाचे साक्षीदार झाल्याची भावना त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी चिमुकल्यांना स्कूल बॅग आणि शालेय साहित्याचे यावेळी वाटप केले.
हे सुद्धा वाचा
अजित पवारांनी साधला ‘मोका’ !
अबुधाबीमध्ये गेल्या 47 वर्षांपासून साजरा होतो गणेशोत्सव !
बावनकुळेंच्या ‘धाब्या’वरून ट्विटरवर ‘काव्य’युद्ध, सुप्रिया सुळे आणि आशिष शेलार यांच्यात ट्विटरवर खडाजंगी
२० जुलैला इर्शाळगडाची दुर्घटना घडली होती. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे स्वत: पहाटेपासून ते संध्याकाळपर्यंत घटनास्थळावर थांबून मदतकार्यावर लक्ष ठेऊन होते. त्यानंतर महिन्याभराच्या आतच म्हणजे १५ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री पुन्हा एकदा इर्शाळवाडीवासियांच्या भेटीला गेले. त्यांच्या तात्पुरत्या निवासाच्या पाहणीसाठी त्यांनी दौरा केला आणि आता थेट आपल्या निवासस्थानी इर्शाळगडवासियांना बोलावून गणराच्या आरतीचा मान दिला.