नवी मुंबई मेट्रोच्या लोकार्पणावरून विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. नवी मुंबई मेट्रोचे लोकार्पण आतापर्यंत तीन वेळा रद्द करण्यात आले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना वेळ मिळत नसल्यामुळे लोकार्पण सोहळा पुढे ढकलण्यात येत आहे, असे कारण राज्य सरकारद्वारा देण्यात येते. यावर, वडेट्टीवार यांनी “केवळ निवडणुकीच्या तोंडावर लोकार्पण करण्यासाठी सरकारचा हा पोर खेळ सुरू आहे. नवी मुंबईकरांना अजून किती दिवस वेठीस धरणार आहात?” असा सवाल सरकारला केला आहे.
नवी मुंबईकरांची 12 वर्षांची प्रतीक्षा आता अजून लांबणार आहे. आधी 13, 14 ऑक्टोबर, त्यानंतर 17 ऑक्टोबर अशा तीन वेळा लोकार्पणासाठी तारखा निश्चित करण्यात आल्या होत्या. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे या तारखा रद्द करण्यात आल्या.
सरकारला वेळ नसेल तर नवी मुंबई मेट्रोचे लोकार्पण आम्ही करू.
नवी मुंबई मेट्रोचे लोकार्पण तीन वेळा रद्द करण्यात आले आहे. प्रधानमंत्र्यांना वेळ मिळत नसल्याचे कारण दाखवत सरकार जनसेवेची कामे रखडवत आहे. केवळ निवडणुकीच्या तोंडावर लोकार्पण करण्यासाठी सरकारचा हा पोर खेळ सुरू आहे. नवी…
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) October 25, 2023
यावर वडेट्टीवार राज्य सरकारवर टीका करत म्हणाले, “सरकारने स्वत:ची पाठ थोपटून घेण्यासाठी न केलेल्या कामांच्या लोकार्पणाचा धडाका लावला आहे. या सरकारला हा नैतिक अधिकार कोणी दिला. न केलेल्या कामाचे लोकार्पण करताना या सरकारला कमीपणा वाटत असावा, म्हणून नवी मुंबई मेट्रोचे लोकार्पण रखडवले आहे. या लोकार्पण सोहळ्यावर कोट्यवधी रूपयांची उधळपट्टी करण्यात येणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. आम्ही हा लोकार्पण सोहळा जनतेचा पैसा न खर्च करता करू,” असा इशारा त्यांनी दिला.
पुढे ते म्हणाले, “आघाडी सरकारच्या काळात मेट्रो प्रकल्पांची मूहूर्तमेढ रोवली. त्यानंतर 12 वर्षे नवी मुंबईकरांनी मेट्रोची वाट पाहिली. 13, 14 ऑक्टोबर आणि त्यानंतर 17 ऑक्टोबर अशा तीन वेळा लोकार्पणासाठी तारखा निश्चित करण्यात आल्या होत्या. पण सरकारने नवी मुंबईकरांची दिशाभूल केली असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण प्रधानमंत्र्यांचा मुंबई दौरा झाला त्यानंतर आता शिर्डी दौऱ्याला वेळ आहे परंतु नवी मुंबईला यायला वेळ नाही. प्रधानमंत्र्यांना वेळ मिळत नसल्याचे कारण दाखवत सरकार अजून किती दिवस जनतेला ताटकळत ठेवणार आहे. लोकार्पणाला वेळ नाही म्हणून पूर्ण झालेल्या प्रकल्पांची सेवा जनतेला मिळत नाही, याचा खेद वाटतो.”
हे ही वाचा
जयंत पाटील म्हणतात, काम माझे; श्रेय घेताहेत नरेंद्र मोदी
चंद्रशेखर बावनकुळे पालघरमध्ये कडाडणार!
मुंबई सिनेट निवडणूक घोटाळ्यावर शिक्कामोर्तब, आशीष शेलारांचा दावा.. पण चौकशीतून आले सत्य समोर!
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुरुवारी, (26 ऑक्टोबर) शिर्डी दौऱ्यावर आले आहेत. शिर्डीमधील विविध विकासकामांचे आज त्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित असणार आहेत.