संसदेच्या विशेष अधिवेशनाचे कामकाज आज सोमवारी, (18 सप्टेंबर) संसद भवनाच्या जुन्या इमारतीत पार पडले. या पाच दिवसीय विशेष अधिवेशनात आज जुन्या इमारतीतील कामकाजाचा शेवटचा दिवस होता. यावेळी, कॉँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी संसदेतील जुन्या आठवाणींना उजाळा देत पं. जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून अटल बिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंह यांचा कार्याचे स्मरण केले. यावेळी चौधरी यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्याबाबत बोलताना, ‘ते नेहमी मौन रहायचे परंतु ते कधी मौन बाळगत नसत. कमी बोलण्यात आणि जास्त काम करण्यावर त्यांचा भर होता.’ असे व्यक्तव्य केले. अधीर रंजन चौधरी यांनी असे व्यक्तव्य करून एकप्रकारे सत्ताधाऱ्यांना टोला लगावला.
संसदेच्या विशेष अधिवेशनातील भाषणात अधीर रंजन चौधरी पुढे म्हणाले, “डॉ. मनमोहन सिंग नेहमी मौन राहायचे. परंतु ते कधी मौन बाळगट नसत. याउलट ते कमी बोलायचे आणि जास्त काम करायचे. भारतात जेव्हा जी-20 परिषद पार पडली तेव्हा आपल्या देशासाठी हे खूपच चांगले असल्याचे त्यांनी सांगितले होते. आज या सभागृहाचा शेवटचा दिवस असल्याने भावूक होणे स्वाभाविक आहे. देशाच्या लोकशाहीच्या रक्षणासाठी याठिकाणी अनेक दिग्गजांनी योगदान दिले आहे.”
Watch: LoP Lok Sabha Shri @adhirrcinc speaks in Parliament. https://t.co/H0MH3H85Cg
— Congress (@INCIndia) September 18, 2023
पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला अधोरेखित करत अधीर रंजन चौधरी पुढे म्हणाले की, “जेव्हा संसदेत संविधानावर आणि लोकशाहीवर चर्चा होईल तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी नक्कीच बोलले जाईल. नेहरूजींना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हटले जायचे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपण संविधानाचे शिल्पकार मानतो. आज या सभागृहात पंडित नेहरूंबद्दल बोलण्याची संधी मिळाली हे बरं झालं,” असे चौधरी यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, “भगतसिंग यांनी १९२९ मध्ये या संसदेत बॉम्ब फेकला होता, पण ब्रिटिश सरकारला जागे करण्यासाठी त्यांनी हे केले. त्यांचा हेतू कोणालाही दुखावण्याचा नव्हता. २००१ मध्ये या संसदेवर झालेला दहशतवादी हल्ला आपल्या सुरक्षा दलांनी तो हाणून पाडला होता.”
तत्पूर्वी, संसदेच्या इतिहासाचा संदर्भ देताना अधीर रंजन चौधरी म्हणाले, ‘मला आपल्या संसदेत काय घडले याचे छोटेसे वर्णन करायचे आहे. 1951 मध्ये लोकप्रतिनिधी कायदा संमत करण्यात आला ज्यामुळे नागरिकांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला. जर आम्हाला व्हेटो देण्याचा अधिकार नसता तर आज आम्हाला इतर कशावरही बोलायला वाव मिळाला नसता. यानंतर कमोडिटी कायदा आला, हरितक्रांती आली… 1974 मध्ये जेव्हा अणुस्फोट झाला तेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या.. याचीही आठवण करून द्या. राजीव गांधी यांनी माहिती आणि तंत्रज्ञान क्रांती आणली. आता आपण डिजिटल इंडियाबद्दल बोलतो, त्याची सुरुवात दिवंगत राजीव गांधी यांनी केली होती. आपण इतिहास विसरता कामा नये, आपण इतिहासाला रद्द केलेला चेक म्हणू शकत नाही.”
आपले भाषण संपवताना चौधरी यांनी राजेश खन्ना यांच्या आनंद चित्रपटातील संवाद म्हणून दाखवला. ‘आम्ही नव्या संसदेमध्ये जात आहोत, पण ह्या जुन्या वास्तुस कायम लक्षात ठेवू. राजेश खन्ना यांनी एका चित्रपटात म्हटले होते की, ‘जिंदगी बडी होनी चाहिये, लंबी नही’ आज आपण जे करत आहोत ते आपल्या भावी पिढ्यांच्या लक्षात राहील. त्यामुळे ‘जिंदगी बडी होनी चंहिये, लंबी नही!” असे बोलून त्यांनी भाषणाचा शेवट केला.
हे ही वाचा
कपिल सिब्बल काय म्हणाले, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबाबत…
संसदेचे विशेष अधिवेशन ऐतिहासिक निर्णयाचं असेल,अधिवेशनापूर्वी मोदींनी केले सूचक व्यक्तव्य!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवडतात हे पदार्थ..
उद्या, मंगळवारी (19 सप्टेंबर) संसद भवन परिसरात सर्व लोकसभा आणि राज्यसभा खासदारांचे एकत्रित फोटोसेशन होणार असून नवीन संसद भवनात अधिवेशनाची सुरुवात होईल.