शिवसेना आणि धनुष्यबाण याबाबत आज निवडणूक आयोगाने एक अंतरिम निर्णय देत पक्षाचे नाव आणि चिन्ह दोन्ही काही काळासाठी गोठवले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात असतानाच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी शिवसेनेवर जळजळीत टीका केली आहे. गजानन काळे यांनी म्हटले आहे की, आता शिल्लक शिवसेनाप्रमुख यांना राष्ट्रवादीचे “घड्याळ”नाहीतर अबू आझमी च्या “सायकल”चाच आधार आहे. असे सांगतानाच संपलेल्या पक्षा बद्दल बोलत नाही, असे म्हणणारे युवराज यांचा पक्ष आणि चिन्ह आता इतिहासात जमा झाला अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे.
शिवसेना पक्ष आणि पक्ष चिन्ह याबाबत आज निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडली. यावेळी सुनावणीत निवडणूक आयोगाला पक्ष आणि चिन्हाबाबत अंतिम निर्णय़ घेता आला नाही.
त्यामुळे निवडणूक आयोगाने अंतरिम आदेश देत शिवसेना नाव आणि पक्षाचे चिन्ह धणुष्यबाण हे निवडणूक आयोगाने तात्परत्यास्वरूपात गोठवले आहे. आगामी निवडणूकीत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना पक्षाचे नाव आणि चिन्ह वापरता येणार नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे पक्षासाठी नाव आणि चिन्ह कोणते वापरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना पक्षाचे नाव देखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही. नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत आयोगाला पर्याय द्यायचे आहेत.
आदित्य ठाकरेंनी केली होती मनसेवर टीका –
महाविकास आघाडी सरकारच्या काळात मनसेने मशिदींवरील लाऊडस्पीकर हटविण्याबाबत आंदोलन छेडले होते. त्यानंतर रामनवमीला शिवसेना भवनाबाहेर लाऊडस्पीकर लाऊन हनुमान चालीसा पठण केली होती. त्यावर माध्यमांनी आदित्य ठाकरे यांना प्रतिक्रीया विचारली असता, ते म्हणाले होते की, स्टंटबाजीला मी महत्त्व देत नाही, प्राण जाय पर वचन ना जाय असे आमचे हिंदूत्व असून संपलेल्या पक्षावर मी बोलत नाही अशी प्रतिक्रिया त्यावेळी त्यांनी दिली होती.