30 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयमहिलांनो आता रस्त्यावर उतरा...असे का म्हणाले शरद पवार

महिलांनो आता रस्त्यावर उतरा…असे का म्हणाले शरद पवार

2 जुलै रोजी अजित पवार हे आठ आमदारांसह सरकारमध्ये सामील झाल्यापासून राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गट आणि शरद पवार गट एकमेकाविरोधात उभे ठाकले आहेत. ‘राष्ट्रवादी आमचीच’ हा वाद थेट सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत पोहचला आहे. अजित पवार गटाकडून जोरदार पक्ष बांधणी सुरू आहे. मंत्रालयासमोरील राष्ट्रवादीचे कार्यालय दररोज गर्दीने फुललेले असते. एकुणात अजित पवार गट पॉवरफुल होत असल्याचे चित्र असतानाच, बुधवारी (११ ऑक्टोबर) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी मुंबईत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. यावेळी बोलताना पवार काहीसे आक्रमक झाल्याचे दिसले. ‘राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरावे. तसेच आंदोलन केल्याने गुन्हे दाखल होतील याला घाबरू नका. आपलं सरकार आल्यावर हे गुन्हे काढून टाकू, ‘असंही नमूद केलं. त्यामुळे येत्या काळात पवार गटाच्या महिला कार्यकर्त्या अधिक आक्रमकपणे सत्ताधाऱ्यांवर तुटून पडणार असे दिसते.

‘आपण संरक्षण खात्यात आरक्षण देण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी अनेकांचा विरोध होता. मात्र मी स्वतः मंत्री म्हणून तो निर्णय घेतला आणि आता तुम्हाला महिला सैन्यात दिसत आहेत. आज आपण बघतो की, २६ जानेवारीच्या दिल्लीतील परेडचं नेतृत्व मुली करतात. एका बाजुला ही जमेची बाजूला आहे आणि दुसरीकडे मणिपूरसारखं उदाहरण आहे. तेथे महिलांची धिंड काढली गेली, व्यक्तिगत हल्ले केले गेले. जीवे मारलं जातं आणि हे चित्र भारतातील आहे. या प्रश्नावर अतिशय जागरूक राहण्याची भूमिका आपण घेतली पाहिजे.’ असेही शरद पवार म्हणाले.

‘अशी घटना घडली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या भागातील भगिनी रस्त्यावर उतरल्याच पाहिजे. त्यासाठी त्यांनी आग्रह धरला पाहिजे. काही होत नाही. रस्त्यावर उतरलं म्हणून एखादा गुन्हा दाखल करतील, एखादं कलम लावतील. विद्या चव्हाण यांचं रेकॉर्ड तपासलं तर त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झालेले लक्षात येईल,’ असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं.

हे सुद्धा वाचा 

ड्रग्ज माफिया भूषण पाटीलला यूपीमधून अटक, ठाकरे गटाकडून दादा भुसेंवर आरोप
औरंगाबाद, उस्मानाबाद नामांतरप्रकरणी पडला हरकतीचा पाऊस
…तर भारतावर हल्ला करू, खालिस्तानी दहशतवाद्याच्या व्हिडीओने खळबळ

‘हे सर्व गुन्हे लोकांच्या प्रश्नासाठी दाखल होतात. त्यामुळे त्याची काही चिंता करायची नसते. कधीतरी सरकार बदलतं, आपले लोक येतात आणि त्यावेळी आम्ही हे गुन्हे काढून टाकतो. त्यामुळे या गुन्ह्यांची काही चिंता करू नका. रास्त प्रश्नांवर रस्त्यावर येणं हा आपला हक्क आहे, ही भूमिका समजून घेतली पाहिजे’, असंही शरद पवारांनी नमूद केलं. राष्ट्रवादी कॉँग्रेस कुणाची यावर 13 तारखेला ‘सर्वोच्च निकाल’ येण्याची आशा आहे. हा निकाल कुणाच्या बाजूने लागतो याबाबत सस्पेन्स आहे. असे असताना शरद पवार यांनी आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी