टीम लय भारी
मुंबई : देशभरातील कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीमुळे रेल्वेने महत्वाचा निर्णय घेतला आहे. लोकल ट्रेनसह नियमितपणे धावणाऱ्या मेल, एक्स्प्रेस गाड्या १२ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. फक्त अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठीच लोकल धावतील, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २५ मार्चपासून मुंबईतील उपनगरीय लोकल सामान्यांसाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. फक्त रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष लोकल चालवताना आता अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी पश्चिम व मध्य रेल्वेवर ३६२ लोकल फेऱ्या चालवण्यात येत आहेत. सामान्यांच्या सेवेत लोकल कधी सेवेत येतील असा प्रश्न असतानाच गुरुवारी रेल्वे बोर्डाने १ जुलै ते १२ ऑगस्टपर्यंत लोकल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबरोबच नियमितपणे धावणाऱ्या पॅसेंजर, मेल-एक्स्प्रेसही बंद ठेवण्यात आल्या आहेत.
पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील लोकल या सामान्यांसाठी बंदच राहतील. फक्त अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठीच लोकल धावतील, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली. लोकल उपलब्ध नसल्याने सामान्यांना मुंबईत तरी बेस्ट, एसटी व खासगी बसनेच प्रवास करावा लागेल. सध्या रेल्वेचा राज्यांतर्गत प्रवासही बंदच आहे.
तिकीटाचा संपूर्ण परतावा देण्यात येणार…
तीन ते चार महिने आधी १२ ऑगस्टपर्यंतच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांचे ज्या प्रवाशांनी आरक्षण केले असेल त्यांना तिकीटाचा संपूर्ण परतावा देण्यात येणार आहे. सध्या रेल्वेचा राज्यांतर्गत प्रवास बंदच आहे. राज्याबाहेर जाणाऱ्या व परराज्यातून राज्यात येण्यासाठीच विशेष गाड्या चालवल्या जात आहेत.