टीम लय भारी
मुंबई : शिवसेनेच्या बहुतांश आमदारांनी बंड पुकारत शिवसेनेला खिंडार पाडले. अनेक दिवस चाललेल्या या सत्तानाट्याच्या घडामोडीनंतर नेमकी शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कोणाचे असा एकच कोलाहल सुरू झाला. अखेर या चर्चेला विराम देत “धनुष्यबाण केवळ शिवसेनेचेच, ते कोणी हिरावून घेऊ शकत नाही”, अशी ठाम भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माध्यमांसमोर मांडली.
शिंदेसेनेच्या बंडानंतर शिवसेनेच्या अनेक रथी – महारथी आपल्या पदाचा राजीनामा देत शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे शिवसेनेचे भविष्य काय, शिवसेनाचे धनुष्यबाण कोण पेलणार, धनुष्यबाण शिंदे गटाचे की ठाकरेंचे असे अनेक प्रश्न राज्यातील जनतेसमोर उभे राहिले होते. या संपुर्ण प्रकरणावर भाष्य करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती, त्यावेळी त्यांनी त्याबाबत पक्षआणि पक्षाच्या चिन्हाबाबत भूमिका स्पष्ट केली.
VIDEO : LIVE : उद्धव ठाकरे पुन्हा बरसले, बंडखोरांविरोधात दंड थोपटले
माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेनेच्या चिन्हाबद्दल सध्या चर्चा सुरू आहे. कायद्याच्या दृष्टीने पाहिले तर जे कायद्यामध्ये नमूद केले आहे, जे घटनेमध्ये आहे त्याआधारे धनुष्यबाण शिवसेनेपासून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळे ती चिंता सोडा, असे म्हणून त्यांनी सैनिकांना, राज्यातील गोंधळात सापडलेल्या जनतेला यावेळी आश्वस्त केले.
पुढे ठाकरे म्हणाले, मतदार पत्रिकेवरचे चिन्ह हे महत्त्वाचे असते जे आपले धनुष्यबाण आहे आणि ते कोणी घेऊ शकत नाही. लोक केवळ धनुष्यबाणावरच विचार करत नाहीत तर धनुष्यबाण हाती घेतलेल्या माणसांची सुद्धा चिन्हे बघतात, असे म्हणून त्यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना मिश्किल टोला लगावला.
नवीन चिन्हाचा विचार करण्याचे अजिबात कारण नाही कारण शिवसेनेपासून धनुष्यबाण कोणीही वेगळा करू शकत नाही. घटनात्मक किंवा कायदेशीर अभ्यासक यांच्याशी चर्चा करूनच मी याविषयी बोलत आहे,उगाचच मनातलं बर वाटावं म्हणून बोलत नाही असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
शिवसेनेच्या चिन्हावरून उफाळलेल्या या वादाला विराम देत उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना चांगलेच सूनावले आहे. त्यामुळे राज्यातील शिवसेना विरूद्ध शिवसेना वाद कुठपर्यंत जाणार, धनुष्यबाण कोणाकडे राहणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हे सुद्धा वाचा…
Exclusive : ‘लय भारी’च्या तडाख्यानंतर सरकारने जारी केले 355 कोटी रुपये
ब्रेकिंग : हवामान खात्याचा मुंबईकरांना ‘रेड अलर्ट’, दुपारनंतर ‘मुसळधार’चा जोर वाढवणार