लय भारी न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात सत्ता स्थापन करण्याच्या अनुषंगाने शिवसेना व भाजप यांच्यात समेट होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. किंबहूना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर शिवसेनेचे सरकार राज्यात स्थापन होण्याची शक्यता बळावू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठीच भाजपच्या गोटातून हा व्हिडीओ व्हायरल केला असल्याचे बोलले जात आहे.
तत्कालिन पंतप्रधान नरसिंहराव व गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या कार्यकाळात ठाकरे यांनी केलेल्या भाषणाचा हा व्हिडीओ असल्याचे दिसून येत आहे. बाळासाहेब आपल्या भाषणात म्हणत आहेत की, भाजपसोबतचा झगडा खूर्ची आणि पदासाठी नाही. खूर्चीसाठी बिल्कूल भांडायचं नाही. आम्हाला भ्रष्टाचारी काँग्रेसचा रावण जाळायचा आहे. दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत हा रावण जाळावाच लागेल. मागील वेळी भाजपचे उमेदवार जिथे पडले, तिथे आम्ही यावेळी उभे राहतो. आम्हाला सत्ता का घ्यायची आहे. काँग्रेसला गाडायचे हे एकच ध्येय नव्हे, तर लोकांना चांगले सरकार द्यायचे आहे. हिंदूत्वाचा चांगला ठसा आम्हाला उमटवायचा आहे.
काँग्रेसला जाळायचे आहे, असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. परंतु याच काँग्रेससोबत शिवसेना आता घरोबा करू पाहात असल्याचा संदेश लोकांमध्ये देण्याच्या उद्देशाने भाजपने हा व्हिडीओ आता बाहेर काढला असावा. विशेष म्हणजे, व्हिडीओ क्लिपच्या कोपऱ्यात मावळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आहे. यावरून भाजपनेच हा व्हिडीओ लोकांसमोर आणल्याचे बोलले जात आहे.
जवळपास 25 वर्षापूर्वीचा हा व्हिडीओ आहे. त्यावेळी भाजपची ताकद नगण्य होती. काँग्रेस मजबूत होता. त्यावेळची राजकीय परिस्थिती वेगळी होती. त्यावेळच्या काँग्रेसपेक्षा आताचा भाजप कैक पटीने धोकादायक बनला आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या त्यावेळच्या भाषणाचा संदर्भ आताच्या परिस्थितीशी जोडणे उचित नसल्याचे सूत्रांनी सांगितले.