टीम लय भारी
पुणे : ‘करोना’च्या ( Coronavirus) भितीने सगळ्यांनाच ग्रासले आहे. ‘करोना’ची लागण होऊ नये याबद्दल समाजमाध्यमांवर नको तेवढे संदेश येत आहेत. अफवांचेही पीक बहरले आहे. यातील खरे संदेश कोणते व खोटे कोणते हे ओळखणे कठीण बनले आहे. या पार्श्वभूमीवर सामान्य लोकांच्या मनातील सगळ्या शंकाचे निरसन करणारी एक माहितीपुस्तिका राज्य सरकारने प्रसिद्ध केली आहे. आता ही माहितीपुस्तिका तळागाळात पोचविली जाणार आहे.
माहितीपुस्तिकेबरोबरच फलक व प्रशिक्षण कार्यक्रमाचीही तजवीज करण्यात आली आहे. ‘राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभागा’मार्फत (आयईसी) ही मोहिम हाती घेण्यात आली आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या सुचनेनुसार हा कार्यक्रम हाती घेण्यात आल्याचे आयईसीचे उपसंचालक कैलास बाविस्कर यांनी ‘लय भारी’शी बोलताना सांगितले.
‘करोना’बाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे साध्या व सोप्या भाषेत शास्त्रीय पद्धतीने माहितीपुस्तिकेद्वारे देण्यात आली आहेत. या माहितीपुस्तिका प्रत्येक जिल्ह्यात पोचविण्यात आल्या आहेत. जिल्हा स्तरावरून त्या अगदी गावागावांत पोचणार आहेत. ‘कोरोना’ टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी, अधिक माहितीसाठी संपर्क कुठे साधावा, ‘कोराना’ कसा ओळखावा अशी इत्यंभूत माहिती या पुस्तिकेत असल्याचे बाविस्कर यांनी सांगितले.
‘करोना’ टाळण्याच्या अनुषंगाने जनजागृती करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. शिवाय ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, वॉट्सअप या माध्यमांतूनही आम्ही प्रचार साहित्य पाठवित आहोत. दूरचित्रवाणी व वृत्तपत्रांतूनही जाहिरातीद्वारे जनजागृती केली जात असल्याचे बाविस्कर म्हणाले.
हे सुद्धा वाचा
Breaking : ‘करोना’ग्रस्तांची संख्या 32, आरोग्य मंत्री राजेश टोपे आज कस्तुरबा रूग्णालयाला भेट देणार
राज्यातील शहरी शाळा, महाविद्यालय ३१ मार्चपर्यंत बंद राहणार : राजेश टोपे