टीम लय भारी
मुंबई : पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या प्रभावी कामाचा ठसा उमठविण्यास सुरूवात केली आहे. आपल्या खात्यांच्या माध्यमातून त्यांनी एका मागोमाग एक निर्णय घेण्यास सुरूवात केली आहे. माहुल येथील प्रदुषणबाधितांना दुसरीकडे घरे दिली पाहिजेत असे त्यांनी शनिवारी अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत मत व्यक्त केले होते. मंगळवारी त्यांनी त्यावर निर्णय घेऊन टाकला.
आदित्य ठाकरे यांनी शनिवारी प्रदुषण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठकीचे आयोजन केले होते. माहुल येथे प्रदुषण फार वाढले आहे. त्यामुळे तेथील रहिवाशांना अन्यत्र स्थलांतरीत करायला हवे अशी भावना त्यांनी त्यावेळी व्यक्त केली होती. त्यानंतर मंगळवारी पुन्हा एक बैठक आयोजित केली. या बैठकीला म्हाडा, मुंबई महानगरपालिका व पर्यावरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या सोबतीने आदित्य ठाकरे यांनी ही बैठक आयोजित केली होती. माहूलमधील प्रदूषणबाधित रहिवाशांना म्हाडाची घरे देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
त्यानुसार येत्या १० दिवसांत म्हाडा आपल्याकडील ३०० घरे मुंबई महानगरपालिककडे हस्तांतरीत करणार आहे. महानगरपालिकेने माहूलमधील अतिप्रदुषीत भागातील ३०० कुटुंबांचे तातडीने या घरांमध्ये पुनवर्सन करावे असे बैठकीत निर्देश देण्यात आले आहेत. उर्वरीत रहिवाशांचेही पुनवर्सन करण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी, अशीही सुचना बैठकीत देण्यात आली.
पर्यावरण व पर्यटन अशा दोन्ही खात्यांमध्ये आदित्य ठाकरे यांनी कामाचा सपाटा लावला आहे. तरूण असूनही एखाद्या कसलेल्या मंत्र्यांप्रमाणे ते काम करीत आहेत. दोन्ही खात्यांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे. पर्यटन व पर्यावरण या खात्यांमधील महत्वाचे प्रश्न, प्रलंबित निर्णय याबाबत त्यांच्याकडे इत्यंभूत माहिती आहे. त्यांच्यासमोर कोणताही मुद्दा उपस्थित केला तरी त्याबाबतची माहिती त्यांच्या अगोदरच असते. त्या मुद्द्यांचे विविध कंगोरे त्यांना ठाऊक असतात. त्यामुळे बैठकीमध्ये आम्हाला पूर्ण अभ्यास करूनच मुद्दे मांडावे लागतात असे एका अधिकाऱ्याने ‘लय भारी’शी बोलताना सांगितले.
हे सुद्धा वाचा
आदित्य ठाकरेंचा भन्नाट उपक्रम, जपानच्या सहकार्याने राज्यातील शेतकऱ्यांसाठी राबविणार ‘ही’ योजना
आदित्य ठाकरेंच्या अभ्यासू मार्गदर्शनावर आयएएस अधिकारीही झाले चकीत