लय भारी टीम
मुंबई : राज्यासह देशात कोरोनाचा प्रकोप वाढत चालला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत १२७३ पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. तर ११ जणांचा मृत्यू झाला आहे. १२७३ पोलिसांपैकी १३१ अधिकारी आहेत. तर आत्तापर्यंत २९१ पोलिसांना डिस्चार्ज मिळाला आहे. या प्रकारामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत चाललेला आहे. आतापर्यंत 30 हजारापेक्षा जास्त रुग्ण झाले असून त्यापैकी मुंबईत 20 हजारापेक्षा जास्त रुग्ण आहेत. यामुळे सरकार समोरील चिंता वाढली आहे. पोलीस दलातही पोलीस कर्मचारी आणि अधिका-यांध्ये प्रचंड प्रमाणात रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे घबराटीचे वातावरण आहे. १२ मेपर्यंत ८१९ पोलिसांना करोनाची लागण झाल्याची माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती. तर १२ मेपर्यंत सात पोलिसांचा मृत्यू झाला होता. आता ही संख्या १२७३ झाली आहे. तर ११ जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात पोलीस दलाचे सर्व कर्मचारी रात्रंदिवस कर्तव्य बजावत आहेत. एकीकडे कामाचा ताण तर दुसरीकडे कोरोनासारख्या महाभयंकर आजाराशी मुकाबला करुन कर्तव्य पार पाडावे लागत आहेत. त्यामुळे पोलीस कर्मचा-यांसह त्यांच्या कुटुंबियांचीही चिंता वाढली आहे.