पावसाळा सुरू होण्यापूर्वी शेतकरी बियाणे, खते खरेदी करतात. अनेकदा त्यात त्यांची फसवणूक होत असते. ती टाळण्यासाठी, बोगस बियाणे, खताची तक्रार आता ९८२२४४६६५५ या व्हॉट्स ॲपवर नंबरवर करता येणार आहे. अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधान सभेत दिली.
नियम २९३ अन्वये डॉ. किरण लहामटे यांनी याबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. अल निनोचा प्रभाव, सरासरीपेक्षा पाउस कमी होण्याची शक्यता व उशिराने झालेले पावसाचे आगमन, यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार काय करत आहे, असा प्रश्न लहामटे यांनी सरकारला केला होता. त्यावर मुंडे बोलत होते.
काही सरकारी कंपन्या खासगी खते विकणाऱ्या मंडळी बरोबर साटेलोटे करतात. त्यावर सरकारचे काय नियंत्रण आहे, असा सवाल काँग्रेस सदस्य बाळासाहेब थोरात यांनी केला. त्याअनुषंगाने कृषीमंत्री मुंडे यांनी कृषी विभागाने केलेल्या कामांची जंत्रीच वाचून दाखवली. राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन ( एक लाख कोटी) व्हावी अशी अपेक्षा आहे.
शेतीचे योगदान वाढवणे आवश्यक आहे. शेतकऱ्याचा शाश्र्वत विकास झाला पाहिजे, असे सरकारचे धोरण आहे. असेही मुंडे म्हणाले. राज्यात काही महिन्यापूर्वी टोमॅटोचे मोठे पीक आले होते. सध्या टोमॅटो टंचाई आहे. शेतकऱ्याला घामाचा फायदा मिळाला पाहिजे, त्याबरोबर ग्राहकांना फायदा झाला पाहिजे अशी मोजमापवर आधारित यंत्रणा आम्हाला निर्माण करायची आहे. बियाणे किती विकले गेले. पेरा किती झाला, याचा डाटा तयार करावा लागेल. सेंटर ऑफ एक्सलेंस फॉर्मर प्रोडक्शन कंपनी सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे, असेही मुंडे यांनी सांगितले.
हे सुद्धा वाचा
खारघर दुर्घटना: एक सदस्य समितीला मुदतवाढ; मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती
कुपोषणाचा राक्षस पुन्हा जागा झाला; चार वर्षात राज्यात ३७ हजार २९२ बालकांचा कुपोषणाने मृत्यू
ढगाळ वातावरणाने इर्शाळवाडीमध्ये मदतकार्यास अडथळे, सिडकोचे १ हजार कर्मचारी एनडीआरएफच्या मदतीला
१ रूपये पीक विमा फसवी आहे, असा आरोप काँग्रेसचे विजय वडट्टीवार यांनी केला. पण मागच्या वर्षी शेतकऱ्यांसाठी ६५५ कोटी प्रीमियम भरला. याची जबाबदारी सरकारने घेतली. शेतकरी उघड्या आभाळाकडे पाहून जमीन कसतो. यंदा ७८ लाख ५२ हजार शेतकऱ्यांनी एक रुपयात विमा भरला आहे. ३१ जुलैपर्यंत विमा भरण्याची अंतिम मुदत आहे. त्यानुसार दररोज ७ लाख शेतकरी विम्याची रक्कम भरतात. प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत फळ पीक विमा योजनेतून ४ हजार ९५१ कोटी नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे लाभार्थी नमो शेतकरी
महासन्मान योजनेचे लाभार्थी ठरतील. या दोन्ही योजनेसाठी सरकारने २४ हजार ७३१ कोटी जमा केले आहेत.असेही मुंडे यांनी सांगितले.