काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीसारख्या घराणेशाही पक्षांनी जम्मू-काश्मीरचे अतोनात नुकसान केले आहे, यंदाची लोकसभा निवडणूक देशात मजबूत सरकार स्थापनेसाठी आहे. विकसित जम्मू-काश्मीरसाठी जम्मू-काश्मीरमधील सर्व जागांवर प्रचंड बहुमताने एनडीए ला निवडून द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी
या सभेला जम्मू-काश्मीर प्रदेश भाजपा अध्यक्ष रविंदर रैना, केंद्रीय मंत्री आणि उधमपूरचे भाजपा उमेदवार जितेंद्र सिंह, जम्मूतील भाजपाचे उमेदवार जुगल किशोर आणि पक्षाचे अन्य ज्येष्ठ नेते उपस्थित होते.पंतप्रधान मोदी म्हणाले की, 1992 मध्ये लाल चौकात तिरंगा फडकवण्यासाठी मी आलो असता या परिसरातील माता-भगिनींनी आशीर्वाद दिले. लोकांनी रस्त्यावर येऊन आमचे भव्य स्वागत केले होते. 2014 मध्ये माता वैष्णोदेवीचे दर्शन घेतल्यानंतर अनेक पिढ्यांनी जे त्रास सहन केले, त्यापासून मी जम्मू-काश्मीरला मुक्त करीन, असे आश्वासन मी याच मैदानावर दिले होते अशी आठवण ही मोदींनी उपस्थितांना करून दिली. आज जम्मू-काश्मीरमधील सर्व जनतेच्या आशीर्वादाने मी ती हमी पूर्ण केली आहे. दशकांनंतर जम्मू काश्मीरमधील ही पहिलीच निवडणूक आहे ज्यात दहशतवाद, फुटीरतावाद, दगडफेक, बंद आणि सीमेपलीकडून गोळीबार हे निवडणुकीचे मुद्दे च नाहीत. आज जम्मू-काश्मीरमध्ये वेगाने विकास होत आहे आणि जनतेचा आमच्यावरचा विश्वास दृढ होत आहे. लाखो कुटुंबांना 5 वर्षांसाठी मोफत रेशन आणि 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळत आहेत. 10 वर्षांत जम्मू-काश्मीरचा कायापालट झाला आहे. गावागावांत वीज, 75 टक्क्यांहून अधिक घरांना पाईपलाइनद्वारे पाणी, डिजिटल कनेक्टिव्हिटीसाठी दुर्गम डोंगरातही मोबाइल टॉवर बसवण्याची मोहीम राबवली जात आहे.
जम्मूतील शेतकऱ्यांना पाणी मिळत नव्हत, गावं अंधारात होती, देशाच्या हक्काचं रावी नदीचे पाणी पाकिस्तानात जात होते. मोदी सरकारने पाकिस्तानात जाणारे पाणी अडवल्यामुळे कठुआ आणि सांभा येथील हजारो शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. काँग्रेसच्या कमकुवत सरकारांनी शाहपूर-कंडी धरण अनेक दशके प्रलंबित ठेवले मात्र आज शाहपूर-कंडी धरणातून निर्माण होणाऱ्या विजेमुळे जम्मू-काश्मीरमधील घरांमध्ये वीज पोहोचणार आहे. कलम 370 वरून कॉंग्रेस करत आलेल्या गलिच्छ राजकारणावर बोट ठेवत मोदी यांनी काँग्रेससह देशातील सर्व राजकीय पक्षांना आव्हान दिले. ते म्हणाले की, विरोधकांनी कलम 370 परत आणू हे जाहीर करावे, मग हा देश त्यांच्याकडे ढुंकूनही पाहणार नाही. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवले तर राज्यात आग लागेल आणि जम्मू-काश्मीर देशापासून वेगळे होईल अशी आग ओकणा-या कॉंग्रेस आणि विरोधकांना जम्मू-काश्मीरच्या तरुणांनी च आरसा दाखवला आहे असे मोदी म्हणाले. विरोधी पक्षांचे नेते देशातील इतर राज्यांत जाऊन विचारतात की, कलम 370 हटवल्याने कोणाला काय फायदा झाला? असे तोंड वर करून विचारणा-या विरोधकांना जम्मू-काश्मीरच्या माता-भगिनीना 370 कलम हटवल्याने काय फायदा झाला हे चांगलेच माहीत आहे. त्यांचा भाऊ आणि मुलगा असलेल्या मोदींनी महिलांना त्यांचे हक्क परत दिले आहेत.
कलम 370 हटवल्यानंतर आज जम्मू-काश्मीरमधील दलित, वाल्मिकी, गट्टा ब्राह्मण आणि कोळी समाजाला घटनात्मक अधिकार मिळत आहेत. सर्वांगीण विकासाच्या दिशेने जम्मू काश्मीरची वाटचाल सुरू आहे. आता सैनिकांच्या वीर मातांना काळजी करण्याची गरज नाही कारण आज दगडफेक होत नाही. आज काश्मीर खोऱ्यातील प्रत्येक माता शांतपणे झोपते, कारण तिचा मुलगा उद्ध्वस्त होण्यापासून वाचला आहे. आता शाळा जाळल्या जात नाहीत तर सजवल्या जातात. आता एम्स, आयआयटी, आयआयएम, आधुनिक बोगदा, रुंद रस्ते आणि उत्कृष्ट रेल्वे पायाभूत सुविधा जम्मू-काश्मीरचे नवे भाग्य बनत आहेत. जम्मू असो की काश्मीर, आता विक्रमी संख्येने पर्यटक आणि भाविक येऊ लागले आहेत. खोऱ्यातील अनेक पिढ्यांनी पाहिलेले स्वप्न आज पूर्ण होत आहे. खोऱ्यातील प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न पूर्तीचा मोदींचा संकल्प आहे असा शब्दांत मोदींनी आश्वस्त केले.
जम्मू-काश्मीरमध्येही विधानसभा निवडणुका होतील तेव्हा जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळेल आणि तो दिवस दूर नाही अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरवासियांच्या जिव्हाळ्याच्या मुद्दयाला हात घातला. येत्या पाच वर्षांत या प्रदेशाला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाईल असा शब्द मोदींनी दिला. देश आणि परदेशातील मोठ-मोठ्या कंपन्या जम्मू-काश्मीरमध्ये गुंतवणूक करणार आहेत. पर्यटनासोबतच जम्मू-काश्मीर क्रीडा आणि स्टार्टअपसाठीही ओळखले जाईल. गेल्या 10 वर्षांत राज्यात क्रांती झाली असून पायाभूत विकासासोबतच जम्मू-काश्मीरचे मन बदलले आहे. जम्मू काश्मीरचा निराशेकडून आशेकडे असा प्रवास सुरू झाला आहे. गेल्या 10 वर्षांत खोऱ्यात झालेली विकासकामे हा केवळ ट्रेलर आहे. आम्हाला जम्मू-काश्मीरचे नवे आणि अद्भुत चित्र बनवायचे आहे असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.