भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे घरात झोपलेल्या आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण (baby abducted) झाल्यानंतर काही दिवसांतच अपहरण करणारी टोळी ताब्यात घेण्यात आली असून पाच जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यात नंदुरबार येथील पोलीस दलातील बिनतारी संदेश विभागातील हवालदाराचाही समावेश आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली .शहरातील पोलीस मुख्यालयातील प्रेरणा सभागृहात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. याप्रसंगी अप्पर अधीक्षक अशोक नखाते, सहायक निरीक्षक दांडगे उपस्थित होते.(Eight-month-old baby abducted in Nashik Jalgaon district)
भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे घरात २३ एप्रिलला मध्यरात्री दोन अनोळखी व्यक्तींनी प्रवेश करुन झोक्यात झोपविलेल्या आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण केले होते.
सहायक निरीक्षक विशाल पाटील, सहायक फौजदार विठ्ठल फुसे, हवालदार युनूस शेख, प्रेमचंद सपकाळे, वाल्मीक सोनवणे, दीपक जाधव, संजय भोई, संजय तायडे आदींच्या पथकाने गोपनीय माहितीनुसार व तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने पाच दिवस शोध घेतला. संशयितांच्या ठिकाणाबाबत गोपनीय माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार भुसावळ येथील शिवपूर-कन्हाळे रस्त्यावरील नारायणनगर परिसरातील अलका जीवनस्पर्श फाउंडेशन येथे छापा टाकला. तेथे अपहरण झालेले आठ महिन्यांचे बाळ मिळून आले. पथकाने अधिक तपासात दीपक परदेशी (३२, रा. नारायणनगर, भुसावळ), अमित परिहार (३०, रा. नागसेन कॉलनी, कंडारी, ता. भुसावळ), कुणाल वाघ (१९, रा. शिंगारबर्डी, साकेगाव, ता. भुसावळ), बाळू इंगळे (५१, रा. ऑर्डनन्स फॅक्टरी, सुशीलनगर, दर्यापूर शिवार, वरणगाव), रिना कदम (४८, रा. नारायणनगर, भुसावळ) यांच्या मुसक्या आवळल्या. त्यातील बाळू इंगळे हा नंदुरबार येथील जिल्हा पोलीस दलातील बिनतारी संदेश विभागात हवालदार म्हणून कार्यरत आहे.याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल होता. पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी, अप्पर अधीक्षक नखाते, भुसावळचे उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांची पथके नियुक्त करण्यात आली.