29 C
Mumbai
Sunday, July 7, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यातल्या १३ विद्यापीठांच्या परीक्षा पूर्णपणे ऑनलाईन होणार : उदय सामंत

राज्यातल्या १३ विद्यापीठांच्या परीक्षा पूर्णपणे ऑनलाईन होणार : उदय सामंत

टीम लय भारी

मुंबई :-  महाराष्ट्र राज्यात कोरोनाची दुसरी लाट निर्माण झाली आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी सरकारने लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आता राज्यात सरकारने कठोर निर्बंध लागू केल्यामुळे ऑफलाईन परीक्षा घेणे अशक्य आहे. राज्य सरकारकडून नुकतेच कोरोनासंदर्भात नियम लागू करण्यात आले आहेत. त्याप्रमाणे १ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत राज्यात कोरोनाबाबतचे कठोर नियम लागू असणार आहेत. यामध्ये संचारबंदीचा देखील समावेश आहे. विद्यापीठाच्या सर्व परीक्षा ऑनलाईन होणार आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, असे उदय सामंत म्हणाले.

पण, आता राज्य सरकारने यासंदर्भात मोठा निर्णय जाहीर केला आहे. उद्यापासून राज्यातील १३ अकृषी विद्यापीठांमधल्या कोणत्याही वर्षाच्या परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जातील, असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले आहे. आत्तापर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन असे पर्याय देण्यात आले होते, विद्यापीठांना त्यासंदर्भात निर्णय घेण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार काही विद्यापीठांनी ऑनलाईन परीक्षा सुरू देखील केल्या होत्या. परंतु, आता सर्व १३ अकृषी विद्यापीठांना ऑनलाईन परीक्षा घेण्याच्या सूचना राज्य सरकारकडून करण्यात आल्या आहेत.

“विद्यार्थी परीक्षांपासून वंचित राहणार नाही!”

“कोविडच्या परिस्थितीमुळे आणि नव्या निर्बंधांमुळे विद्यार्थ्यांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. त्यामुळेच आम्ही सर्वानुमते निर्णय घेतला आहे की महाराष्ट्रातल्या सर्व १३ अकृषी विद्यापीठांमध्ये उरलेल्या सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जातील. या परीक्षा घेताना जर विद्यार्थ्यांना काही तांत्रिक अडचणी निर्माण होणार असतील, तर त्याची पूर्तता करण्याच्या सूचना आणि विनंती मी सर्व १३ विद्यापीठांच्या कुलगुरुंना केली आहे. या परीक्षांमधून कोणतेही विद्यार्थी वंचित राहणार नाहीत, याची दक्षता या विद्यापीठांनी घेतली पाहिजे”, अशी माहिती उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

“उद्यापासूनच परीक्षा ऑनलाईन”

तसेच हा निर्णय उद्यापासूनच लागू करण्यात येईल, असे यावेळी उदय सामंत यांनी यावेळी सांगितले. “सर्व विद्यापीठांमध्ये परीक्षा सुरू आहेत. काही ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीत ऑफलाईन परीक्षा घेण्यात आल्या आहेत. पण उद्यापासून त्या शक्य नसल्यामुळे सर्वच कुलगुरुंनी सरकारला विनंती केली होती. त्यानुसार आजच्या बैठकीत निर्णय घेण्यात आलेला आहे. कोणत्याही विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी विद्यापीठांनी घ्यायची आहे. या परीक्षांमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय अशा सर्वच वर्गांच्या परीक्षांचा समावेश असेल”, अशी माहिती त्यांनी दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी