गेली दोन वर्षे कोरोनामुळे सण, उत्सवांवर देखील निर्बंध आले होते. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आदी महत्वाचे सण देखील साधेपणाने साजरे करावे लागले. कोरोना काळामध्ये श्रद्धाळू, भाविक भक्तांनी घरातच साध्यापद्धतीने सण साजरे केले. मात्र यंदा कोरोना महामारीनंतर दोन वर्षांनी राज्यात निर्बंधमुक्त नवरात्रोत्सव साजरा करण्यात आला. कोल्हापूरच्या प्रसिद्ध अंबाबाई मंदिरात देखील मोठ्या उत्साहात नऊ दिवस नवरात्रोत्सव साजरा करण्यात आला. नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत २४ लाख भाविकांनी कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेतेले.
मंदिर प्रशासनाने सांगितले की, नवरात्रोत्सव काळात भाविकांनी इतक्या मोठ्या संख्येने देवीच्या दर्शनासाठी मंदिराला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे विश्वस्त शिवराज नाइकवडे म्हणाले, कोरोना महामारीच्या दोन वर्षांनंतर भाविकांसाठी कोरोनाचे निर्बंध न लावता मंदिर खुले ठेवले होते. नवरात्रोत्सवाच्या १० दिवसांच्या काळात २३ लाख ६४ हजार २४४ भाविकांनी अंबाबाई मंदिराला भेट दिली. भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती असल्याने या काळात दर्शनासाठी रांगा लागून गर्दी होऊ नये यासाठी मंदिर अधिक काळ उघडे ठेवण्यात आले होते. यापूर्वी एका दिवशी अधिकतम ४ लाख भाविक मंदिरात दर्शनासाठी येत होते. मात्र यंदा नवरात्रीदरम्यान सातव्या दिवशी भाविकांची संख्या ७ लाख ७३ हजार ७२१ वर पोहचली.
हे सुद्धा वाचा —
MPSC Exam: एमपीएससीच्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी; या परीक्षांच्या तारखा जाहीर
Deepak Kesarkar : शालेय जीवनात योगाभ्यास आणण्याबाबत विचार; शिक्षणमंत्री दिपक केसरकरांचे सुतोवाच
१ लाख २९ हजार प्रसादाच्या लांडूंची विक्री –
दरम्यान नवरात्रोत्सवाच्या काळात १ लाख २९ हजार ९६० प्रसादाच्या लाडूची विक्री झाली. त्यातून मंदिर प्रशासनाला १२ लाख ९९ हजार ६०० रुपये मिळाले. तर साधारण ५ लाख भाविकांनी अंबाबाईच्या लाईव्ह दर्शनाचा लाभ घेतला. तसेच ४२ लाख भाविकांनी मंदिराच्या वेबसाईला भेट दिल्याची माहिती मंदीर प्रशासनाने दिली.