टीम लय भारी
मुंबई l रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी अन्वय नाईक प्रकरणात तुरुंगात आहेत. त्यांच्या अटकेवरून महाविकास आघाडी सरकारवर भाजपाकडून टीका होत आहे. या टीकेला प्रत्युत्तर देताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तत्कालीन फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केला. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण पूर्वीच्या फडणवीस सरकारनं हे प्रकरण दाबलं होतं.
राष्ट्रवादीचे नेते राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, अर्णब गोस्वामी यांना करण्यात आलेली अटक पत्रकारीतेशी संबंधित नाही. त्यांनी वैयक्तिक आयुष्यात एका कुटुंबाचे पैसे दिले नाहीत. त्यामुळे त्या कुटुंबातील दोघांनी आत्महत्या केली.
या आत्महत्येपूर्वी अन्वय नाईक यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये अर्णब गोस्वामी यांचे नाव आहे. ते एकटेच नाही, तर आणखी दोघांची नावं त्यात आहे. त्याप्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे,” अशी भूमिका पाटील यांनी मांडली.
“नाईक कुटुंबीयांनी न्यायालयाला विनंती केली. त्यानंतर न्यायालयाच्या परवानगीने हे प्रकरण पुन्हा उघडण्यात आलं. पूर्वीच्या सरकारनं हे प्रकरण दाबलं होतं. पूर्वीच्या सरकारच्या काळात गोस्वामी यांच्या घरी जाऊन पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवला होता. खरे तर गुन्ह्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला पोलीस ठाण्यात बोलावून त्याचा जाब नोंदवला जातो.
पूर्वीच्या सरकारच्या काळात उलटाच प्रकार झाला. आता पोलिसांना काही धागेदोरे सापडले असतील. त्यामुळे त्यांना अटक केली. याप्रकरणात राज्य सरकारचा काहीही हस्तक्षेप नाही. कायदा सर्वांना समान आहे,” असं म्हणत पाटील यांनी तत्कालिन फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केला.