टीम लय भारी
मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या पाच जागांसाठी सुरळीतपणे निवडणुका पार पडल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने आता ग्रामपंचायत निवडणुकांचा (Gram Panchayat Election) कार्यक्रम जाहीर केला आहे. कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे लांबणीवर पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुका आता जानेवारीत होणार आहेत.
राज्यातील ३४ जिल्ह्यांतील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम शुक्रवारी जाहीर करण्यात आला. या सर्व ठिकाणी १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान होणार असून २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
दरम्यान, १४ हजारांवर ग्रामपंचायतींमध्ये एकाचवेळी निवडणुका होत असल्याने गावागावांतील राजकारण चांगलेच तापणार आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप यांच्यातील ही दुसरी लढत ठरणार आहे. नुकत्याच झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपला जोरदार दणका दिला होता. त्यानंतर आता ग्रामीण महाराष्ट्रात कोण बाजी मारते, हे या निवडणुकांच्या निकालांतून कळणार आहे.
निवडणूक कार्यक्रम
15 डिसेंबर – तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील
23 ते 30 डिसेंबर – नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा कालावधी
31 डिसेंबर – उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आणि अर्जांची छाननी
4 जानेवारी – उमेदवारांची अंतिम यादी
15 जानेवारी – मतदान
18 जानेवारी – मतमोजणी